इंफाळ – राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली ताब्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकाराच्या सुटकेचे आदेश मणिपूर उच्च न्यायालयाने दिले आहेत. किशोरचंद्र वांगखेम असे या पत्रकाराचे नाव आहे. पश्चिम इंफाळच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या पत्रकाराला ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. मणिपूर उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय विभागीय खंडपिठाने हे आदेश रद्द केले आणि अन्य कोणत्याही प्रकरणात वांगखेम यांना ताब्यात ठेवणे गरजेचे नसेल तर वांगखेम यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश दिले.
भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांच्यावर टीका केल्यामुळे गेल्या वर्षी 21 नोव्हेंबरला वांगखेम यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता आणि 12 महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. आपल्याविरोधातील कारवाईला वांगखेम यांनी 20 डिसेंबरला वरिष्ठ न्यायालयात आव्हान दिले होते. तुरुंगात वांगखेम यांची प्रकृती ढासळली असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयाकडे केली होती.