श्रीगोंदा : तालुक्यात मागील तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे रब्बी हंगामातील पिके, तसेच फळबागांवर मोठा दुष्परिणाम होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे. मंगळवारी संध्याकाळी कोळगावसह परिसरात रिमझिम पाऊस पडला. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे शेतकरी वर्ग पुरता हैराण झाला आहे. कधी कडाक्याची थंडी अन् धुके तर कधी ढगाळ वातावरण यामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे.
गेल्या पंधरवड्यात कडाक्याची थंडी पडल्याने पिकांच्या वाढीसाठी चांगली मदत होण्याच्या आशेने शेतकरी सुखावला होता. मात्र, या आठवड्यात थंडी ओसरून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. ढगाळ वातावरण असल्याने ज्वारी, हरभरा, कांदा या उभ्या पिकांवर रोगांचा प्रार्दुभाव होऊन पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांवर डाऊनी, भुरी, करपा रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. फुलोरा अवस्थेमध्ये असलेल्या द्राक्षाच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.
वातावरणातील दिवसेंदिवस होणारा चढ-उतार या पिकांना घातक ठरू शकतो. आधीच शेतकरी विविध संकटातून मार्गक्रमण करत असताना दुसरीकडे मात्र वातावरणातील चढ-उतारामुळे शेती पिकांची वाताहात होताना दिसत आहे. ज्वारी, हरभरा, कांदा या पिकांबरोबरच डाळिंब, द्राक्ष यासारख्या फळबागांवर ढगाळ वातावरणामुळे रोग पडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आला आहे.
वातावरणातील बदलाने फळंबागावर डाऊनी, भुरी, करपा रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. यावरील महागड्या उपाय योजनामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. चालू वर्षी पिकाचा खर्च आणि उत्पन्न यात मोठी तफावत होणाऱ्या असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे.
– योगेश रेपाळे, द्राक्ष बागायतदार, पारगाव सुद्रिक
ढगाळ वातावरणामुळे वाढलेला रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी बुरशीनाशक तसेच कीटकनाशक याचा वापर करावा. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक तसेच कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
– शशिकांत गांगर्डे,