पुणे – संत्र मूळचं दक्षिण चीनमधील आहे. संत्र आंबट, गोड व रसाळ असते. ते शीतल असते. वर्षातून दोनदा संत्र्यांचा सीझन असतो. नागपूरमधील संत्री उत्कृष्ट प्रतीची मानली जातात. तिथे संत्र्यांचे मुबलक पीक होते. संत्र्याचा रस चयापचयाच्या क्रियेत शरीरात आम्लाचे अवशेष ठेवतो. यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते.
गुणधर्म – संत्र आंबट, मधुर, क्षुधावर्धक, रक्तशोधक, पित्तशामक, वातनाशक, शीतल, स्निग्ध, रुचकर आणि मुखशुद्धीकारक असते. ती तापातदेखील हितकारक आहेत. संत्र्याच्या रसाच्या सेवनाने पोटातील कृमी आणि पोटशूळाचा विकार दूर होतो. हाडे मजबूत होतात.
संत्र्याच्या रसात जीवनसत्त्व सी पुष्कळ प्रमाणात असते. 124 ते 150 मि. लि. संत्र्याचा रस घेतला असता सी जीवनसत्त्वची संपूर्ण दिवसाची गरज भागते. संत्र्यामध्ये असलेले सी जीवनसत्त्व सायट्रिक ऍसिडमुळे सुरक्षित असल्याने ते लवकर नष्ट होत नाही.
याशिवाय संत्र्यामध्ये सी जीवनसत्त्व व कॅल्शियम संयुक्त स्वरूपात असल्याने दोन्ही एकमेकांच्या गुणांची वाढ करण्यास पोषक ठरतात. संत्र्याच्या फोडीवरील सफेद पातळ आवरणात कॅल्शियम पुष्कळ प्रमाणात असते. संत्र्याच्या रसात तेजाबचे प्रमाण कमी असते. त्यातील सायट्रिक ऍसिड क्षारधर्मी आहे.
औषधी उपयोग – संत्रे चावून खाल्लेले चांगले असले तरी संत्र्याचा रस अधिक हितकारक असतो. सर्द प्रकृती असलेल्यांनी संत्र्याच्या रसात थोडे गरम पाणी मिसळून मग ते प्यावे. रात्री झोपण्यापूर्वी आणि पहाटे एक-दोन संत्री चावून खाल्ल्याने बद्धकोष्ठता नाहीशी होते. दमा आणि श्वासनलिकेच्या सुजेवर संत्र्याचा रस गुणकारी असतो. तापामध्ये संत्र्याच्या रसाने रोग्याला शक्ती मिळते.
त्यामुळे पचनशक्ती सुधारते आणि भूक वाढते. संत्र्याच्या रसाच्या सेवनाने पचनसंस्थेमधील निरुपयोगी जंतूचा नाश होतो आणि आंतडी सुदृढ बनतात. संत्र्याच्या रसामुळे जीवनशक्तीत वाढ होते. गर्भवतीला उलट्यांचा त्रास होत असेल तर आराम वाटण्यासाठी संत्र्याचा रस प्यावा. संत्र्याच्या एक कप रसातून जवळजवळ पाऊण कप दुधाइतकी उष्णता शरीराला प्राप्त होते. अन्न पचन नीट झाले नाही तर अन्न कुजण्याची प्रक्रिया घडते. त्यामुळे गॅस निर्माण होऊन जठर आणि लहान आतड्यात बिघाड होतो. अशा वेळी संत्रा रस घेतला तर तो जठर आणि आतड्याचा मार्ग स्वच्छ करतो. त्यामुळे या दोन्ही अवयवांची पचनशक्ती सुधारते.