पुणे – किसान रेल्वे सुरू झाल्याने वाहतुकीचा खर्च कमी होणार आहे. ही बाब शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारी असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
विदर्भातील नागपूर आणि आसपासच्या परिसरात संत्र्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. संत्र्यांना विविध ठिकाणांहून मागणी असते. मात्र, रस्ते वाहतुकीत अधिक कालावधी लागल्याने कृषी उत्पादने खराब होण्याची शक्यता असते.
याच पार्श्वभूमीवर कृषी आणि नाशवंत उत्पादनांची जलद वाहतूक करण्यासाठी “किसान रेल्वे’ पाठोपाठ आता “ऑरेंज किसान रेल्वे’ला हिरवा झेंडा दाखवला.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी “व्हिडीओ लिंक’द्वारे बुधवारी नागपूर ते दिल्लीपर्यंत धावणाऱ्या “ऑरेंज किसान रेल्वे’ला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. यावेळी लोकप्रतिनिधी, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी रेल्वेच्या प्रयत्नांचे कौतूक केले.