सत्यजितसिंह पाटणकर यांचे आवाहन
पाटण – माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या माध्यमातून पाटण तालुक्यातील वाडी वस्तीवर रस्त्यांचे जाळे निर्माण झाले. त्यामुळे लोकांचा दळणवळणाचा मोठा प्रश्न दूर झाला. यापुढेही तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी बहुमताने निवडून द्या, असे आवाहन युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ मल्हारपेठ ता. पाटण येथे आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी यशस्विनीदेवी पाटणकर होत्या. यावेळी ज्योती पवार, भाग्यश्री हिरवे, सुषमा चव्हाण, संगीता वाघ यांच्यासह मल्हारपेठ परिसरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, विरोधक विकासाच्या नावाखाली लोकांना फसविण्याचा प्रयत्न करत आहेत.
विरोधकांनी फक्त विकासकामांचे नारळ फोडले पण किती योजना प्रत्यक्षात पूर्ण केल्या याचा सर्वांनी विचार करावा. कोणत्याही अमिषाला बळी न पडता महाआघाडीला बळकट करावे. यशस्विनीदेवी पाटणकर म्हणाल्या, शेतकरी राजा तसेच सर्वसामान्य जनतेवर सध्या होणाऱ्या हुकूमशाही जाचाला आता सर्वजणच कंटाळले आहेत. महाआघाडीचेच उमेदवार हा अन्याय संपवू शकतात.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांना खरा न्याय मिळण्यासाठी श्रीनिवास पाटील व सत्यजितसिंह पाटणकर यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. सभेत रेखाताई पाटील, मिलन सय्यद, शोभा कदम, रोहिणी पाटील, स्नेहल जाधव यांनी आपल्या भाषणात सत्यजितसिंह पाटणकर व श्रीनिवासजी पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देण्याची ग्वाही दिली.
प्रचारा सभेत शंकर शेडगे, समीर कदम, आप्पासाहेब पानस्कर, साहेबराव देसाई, सुरेश पाटील, आनंदराव पवार आदी मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी निलेश चव्हाण, नवनाथ चिंचकर, अवधूत कांबळे, रोहित हिरवे, संजय चव्हाण, आबासाहेब वाघ, अभिषेक निकम, नितीन पवार यांच्यासह महिला, पुरूष, युवक बहुसंख्येने उपस्थित होते.