काठमांडू – नेपाळमधील सत्तारुढ नेपाळ कम्युनिस्त पार्टीतून फुटून बाहेर पडलेल्या पुष्प कमल दहाल प्रचंड यांनी पंतप्रधान कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी आपली चूक दुरुस्त केली नाही तर सिंघा दरबार आणि बालुवॉटरला हजारो समर्थकांसह घेराव घातला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
पंतप्रधान ओली यांनी राज्यघटनेची हत्या करून एक मोठा गुन्हा केला आहे आणि आता लोकांना ते फार चांगले समजले आहे, असे काठमांडूतील भृकुटीमंडप येथे आपल्या गटाने आयोजित मेळाव्यात प्रचंड यांनी सांगितले. यापुढील रॅलीमध्ये पंतप्रधान कार्यालय आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी आपल्या समर्थकांना आवाहन केले जाईल. खोटी विधाने करून निवडणूक आयोगाला धमकावणे आणि इतर घटनात्मक संस्था ताब्यात घेऊन जनतेची फसवणूक करणे पंतप्रधान ओली यांनी थांबवावे, असेही प्रचंड म्हणाले.
निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय पंतप्रधानांच्या दबावाखाली आले आहेत. हे काही चांगले लक्षण नाही. आपल्याला अजूनही देशातील घटनात्मक संस्थांवर विश्वास आहे. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयानेही सरकारच्या दबावाखाली न येता योग्य निर्णय द्यावा, असेही प्रचंड यांनी सांगितले.