15 ऑगस्टपर्यंत पाणी उपसा बंद करण्याचा शासन निर्णय
पाणी उपसा पूर्ववत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
नगर – जायकवाडी धरणातून शासनाने केलेल्या पाणी उपसा बंदीच्या निर्णयाला मा.आ. चंद्रशेखर घुले पाटील यांनी विरोध दर्शवला असून, या निर्णयाने शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांचा पाणी उपसा बंद करण्यात येत असेल तर औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक औद्योगिक कंपन्यांना होणारा पाणी पुरवठा देखील बंद करणार का? असा प्रश्न उपस्थित करुन या शेतकरी विरोधी निर्णयाचा घुले यांनी निषेध नोंदविला आहे. तसेच पाणी उपसा पुर्ववत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही घुले यांनी दिला आहे.
शासनाने नुकतेच जायकवाडी धरणामधून 15 ऑगस्टपर्यंत पाणी उपसा बंद करण्याचा व शेवगाव-पाथर्डी मतदार संघातील चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलतांना शेवगाव-पाथर्डी मतदार संघाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील म्हणाले, राज्य शासनाने 15 ऑगस्टपर्यंत जायकवाडी जलाशयातील पाणी उचलण्यास मनाई केली आहे. पाणी उचलणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. एकीकडे पाणी टंचाईच्या नावाखाली शेतकऱ्यांवर बंधने घालत असतांना पंचतारांकित एमआयडीसीतील उद्योगपतींना मात्र पाणी उचलण्याची मोकळीक दिली जात आहे. शेतकऱ्यांसाठी असलेली बंधने उद्योगपतींना का लागू नाहीत? एमआयडीसीने पाणी उचलल्यास त्यांच्यावर ही गुन्हे दाखल करणार आहात का? नगर जिल्ह्यात केवळ 7 टक्के पाऊस झाला.
शेवगाव-पाथर्डी हा सर्वाधिक पाण्याचे टॅंकर सुरू असलेला मतदारसंघ असतांना चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय कोणाच्या सांगण्यावरू घेतला गेला. याबाबत शेवगाव-पाथर्डीचे विद्यमान लोकप्रतिनिधी गप्प का आहेत? चारा छावण्यांचे मागील बिले अद्याप मिळालेली नाहीत. मतदार संघातील 3 लाख जनता आणि मोठ्या प्रमाणात पशुधन, पिण्याच्या पाण्यासाठी पाणी पुरवठा योजनांवर अवलंबून आहे. ताजनापूरसह मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांचे कामे बाकी असतांना जायकवडीचे पाणी दुसऱ्या जिल्ह्यात पाठविण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या निर्णयाने आर्थिकदृष्ट्या संकटात सापडत आहे. मात्र या बाबतीत ही विद्यमान लोकप्रतिनिधी गप्प का आहे ? असा प्रश्न घुले यांनी उपस्थित केला.
जायकवाडी जलाशय परिसरात शेतीसाठी 12 तासावरून 4 तास, कधी दिवसाआड तर कधी दोन दिवसाआड वीज आणि आंदोलन केल्यावर शेतीची वीज 6 तास करण्यात येते हे अन्यायकारक आहे. शेतीची वीज पूर्ववत व्हावी, चारा छावण्या चालूच ठेवाव्यात आणि चारा छावण्यांच्या बिलाची रक्कम त्वरित बॅंक खाती वर्ग करावी अशी मागणी केली. असे न झाल्यास 9 ऑगस्ट 2019 रोजी क्रांतिदिनी शेतकरी रस्तावर उतरून आंदोलनाचे मार्गाने जाब विचारतील असा इशाराही घुले यांनी दिला.