पर्यावरण परिणाम परीक्षण मसुद्याला देशभरातून विरोध
पुणे – देशभरात गेल्या चार महिन्यापासून ज्या मसुद्याविषयी असंतोषाची लाट उसळली आहे, त्या पर्यावरण परिणाम परीक्षण मसुद्याबाबत हरकती आणि सूचना नोंदवण्याची मुदत दि.11 रोजी संपली आहे. या मसुद्याविरोधात आतापर्यंत देशभरातून 17 लाख नागरिकांनी हरकती नोंदवल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल विभागाने दिली आहे.
पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा परीक्षण अहवाल म्हणजेच “इन्व्हायरमेन्ट इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट’ केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयातर्फे दरवर्षी तयार केला जातो. या मूल्यांकनांतरच नवीन प्रकल्पांना मंजुरी दिली जाते. मात्र, नुकतेच मंत्रालायाने यासाठी नवीन नियमावली तयार केली आहे. त्यानुसार नवीन औद्योगिक प्रकल्पांना म्हणजेच धरण, खाणी, विमानतळ, महामार्गांसाठी परवानगी देण्यातील अटी शिथिल केल्या आहेत. तसेच याबाबत 11 ऑगस्टपर्यंत जनतेच्या हरकती आणि सूचना मागवल्या होत्या.
मात्र, या मसुद्यातील अनेक बदल हे पर्यावरणविरोधी असून, त्याबाबत पर्यावरण अभ्यासकांकडून आक्षेप व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी गेल्या काही महिन्यापासून सतत्याने ऑनलाइन आंदोलनेदेखील केली जात आहेत. तसेच ऑनलाइन स्वरूपात नागरिकांनी आपले आक्षेप नोंदवावे, असे आवाहनदेखील अभ्यासकांकडून केले जात आहे.