माजी चेअरमन बलवंत पाटील मागणार न्यायालयात दाद
त्यांची फेरनियुक्ती माझ्या कालावधीत नव्हे
मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात भरती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर माझ्या चेअरमनपदाच्या कालावधीत त्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या न्यायालयाने रद्द केल्या. परंतु मी चेअरमन पदाचा राजीनामा दिल्यानंतर नियुक्त्या रद्द केलेल्या कर्मचाऱ्यांना विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कालावधीत फेरनियुक्त्या देण्यात आल्या आहेत, असे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले.
सातारा – प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या कर्मचारी भरतीला विरोध वाढला असून आता माजी चेअरमन बलवंत पाटील यांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. आपला कर्मचारीला भरतीला विरोध आहे. मात्र, तरी देखील भरती प्रक्रिया झालीच तर ती रिझर्व्ह बॅंकेच्या बोर्डाच्या माध्यमातूनच झाली पाहिजे, असे पाटील यांनी सांगितले.
साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, नवनाथ भरगुडे, सुभाष ढालपे, विजय खरात, विजय खांडके, दिपक गिरी, रामभाऊ थोरात, दत्तात्रय पवार, संजय उबाळे, अशोक पडवळ उपस्थित होते.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, शिक्षक बॅंकेत कर्मचारी भरतीची आवश्यकता नसताना 37 कर्मचारी भरतीचा घाट घातला जात आहे. भरतीला विरोध करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक आणि मंत्र्यांकडे दाद मागितली. मात्र, त्या ठिकाणी संचालकांनी बहुताने निर्णय घेतल्याचे कारण सांगण्यात आले. त्यामुळे आता निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. याचिकेत मुळत: भरती प्रक्रिया रद्दच झाली पाहिजे अथवा होणारी भरतीचे अधिकार संचालक मंडळाऐवजी रिझर्व्ह बॅंकेच्या बोर्डाला देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येणार आहे.
वास्तविक शिक्षक बॅंकेची संपुर्ण कर्जवसूली ही जिल्हा परिषदेकडून मिळणाऱ्या पगारातून होत असते. त्यामूळे बॅंकेला वसुली प्रक्रियेसाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागत नाही. त्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या पगाराच्या रक्केतून मोठी बचत होत आहे. सद्यःस्थितीला बॅंकेला दरवर्षी 16 कोटीच्या आसपास नफा होतो. नफ्यामुळे कर्जावरील व्याज कमी करणे अपेक्षित होते. मात्र, तसा कोणताही निर्णय घेण्यात येत नसल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.