नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचा डीएनएच आरक्षण विरोधी आहे, पण आम्ही शोषित, पीडितांना लागू करण्यात आलेले आरक्षण कधीच रद्द होऊ देणार नाही असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी म्हटले आहे की, मोदी आणि आणि शहा यांनी आरक्षण रद्द करण्याची कितीही स्वप्ने बघितली तरी आम्ही ते होऊ देणार नाही.
उत्तराखंड मधील भाजप सरकारच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेच्या सुनावणीच्यावेळी सरकारी नोकरीत अर्ज करताना किंवा बढती मागताना आरक्षण हा आपला मुलभूत अधिकार आहे अशी धारणा अर्जदारांनी ठेवता कामा नये असा युक्तिवाद केला होता. आरक्षण देणे हा कोणत्याही राज्य सरकारची घटनात्मक जबाबदारी नाही असा दावाही उत्तराखंडमधील सरकारच्यावतीने सुप्रिम कोर्टात करण्यात आला आहे. त्यावर सध्या मोठीच प्रतिक्रीया येत असून त्यावर आपली भूमिका व्यक्त करताना राहुल गांधी यांनी भाजपवर ही टीका केली. आज संसदेच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, दलित, अदिवासी, आणि ओबीसींना आरक्षण लागू असणे अजून संघ आणि भाजपच्या पचनी पडलेले नाही.
आरक्षणामुळे ते त्रस्त झाले आहेत. या लोकांना रोज सकाळी उठल्यानंतर आरक्षणाचा मोठाच त्रास होतो अशी टिपण्णी त्यांनी केली. या वर्गाला तो अधिकार आपल्या घटनेने दिला आहे हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. पण ते या ना त्या मार्गाने आरक्षणावर घाला घालण्याचाच प्रयत्न करीत आहेत असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे. आरक्षण हा मुलभूत अधिकार नाही असा युक्तिवाद भाजपने आज कोर्टात केला आहे ते तुम्ही ऐकलेच असेल त्यामुळे आरक्षण विरोध हाच भाजप आणि संघाचा डीएनए आहे अशी टीका त्यांनी केली.