ईव्हीएमबाबत पुन्हा उपस्थित केली शंका
कोलकता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पुन्हा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) विश्वासार्हतेबाबत शंका उपस्थित केली. निवडणुकांमध्ये ईव्हीएमऐवजी पुन्हा मतपत्रिकांचा वापर केला जावा या मागणीसाठी विरोधकांनी एकवटावे, असे आवाहनही त्यांनी केले.
लोकसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा घवघवीत यश संपादन करताना सलग दुसऱ्यांदा केंद्राची सत्ता काबीज केली. पश्चिम बंगालमध्येही भाजपने मुसंडी मारली. त्यामुळे तृणमूलच्या जागा यावेळी घटल्या. तृणमूलच्या पीछेहाटीचा आढावा घेण्यासाठी ममतांनी सोमवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ममतांनी ईव्हीएमच्या वास्तवाचा शोध घेण्यासाठी समिती स्थापण्याची मागणी केली. लोकशाही वाचवण्याची गरज आहे.
आम्हाला ईव्हीएम नको; तर मतपत्रिका हव्यात. त्यासाठी आम्ही आंदोलन करू. त्याची सुरूवात बंगालमधून होईल. अमेरिकेसारख्या देशानेही ईव्हीएमवर बंदी घातली आहे, असे त्या पुढे बोलताना म्हणाल्या. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने धनशक्ती, मनगटशक्ती, सरकार, सरकारी संस्था आणि प्रसारमाध्यमांचा वापर केला. तसे असूनही तृणमूलच्या मतांमध्ये यावेळी 4 टक्क्यांनी वाढ झाली, असेही त्यांनी म्हटले.