बेंगळुरू – जनतेवर महागाईचा बोजा पडता कामा नये या मताशी मी सहमत आहे, या बाबतीत मी जनतेच्या पाठीशीच आहे, पण विरोधी पक्षांना महागाईवर बोलण्याचा अधिकार नाहीं असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीमारामन यांनी म्हटले आहे.
त्या आज कर्नाटकातील आपल्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, विरोधकांनी महागाईवर बोलताना स्वत:च्या सत्तेच्या कार्यकाळात काय झाले ते तपासावे.
बजरंग दलावर बंदी घालण्याचे कॉंग्रेसचे आश्वासनही मूर्खपणाचे उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. त्या म्हणाल्या की, आम्ही नेहमी हनुमान चालीसा वाचतो आणि बजरंग बलीची प्रार्थना करतो, पण कॉंग्रेसवाले निवडणुकीच्या वेळी असे करतात.
कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात कर्नाटकात धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्या बजरंगदल आणि पीएफआय सारख्या कट्टरपंथीय संघटनांवर सक्त कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्या अनुषंगाने हा बजरंगबलीचा अपमान आहे असा प्रचार भाजपने राज्यभर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन यांनी हा दावा केला.