नवी दिल्ली – “आम्ही अणुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवलेले नाहीत’, पाकिस्तानला इशारा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानमधील बारमेर येथील प्रचार सभेत केलेल्या या विधानावर कॉंग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे. यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार कॉंग्रेसने केली आहे. यानंतर मोदींच्या या विधानाचा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला आहे.
पाकिस्तानला इशारा देताना मोदी या प्रचार सभेत म्हणाले होते की, पाकिस्तानकडून देण्यात येणाऱ्या अण्वस्रांच्या धमक्यांना भारत आता घाबरणार नाही. भारताची भुमिका आता बदलली आहे. आमच्याकडीलही अणुबॉम्ब आम्ही दिवाळीसाठी ठेवलेले नाहीत.
दरम्यान, मोदींच्या या विधानावर आक्षेप घेत कॉंग्रेसने 22 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. पंतप्रधानांनी या विधानाद्वारे सैन्याला अणुबॉम्ब वापरण्याचे आवाहन केले आहे. हा प्रकार आदर्श आचारसंहितेचा भंग करणारा आहे. त्यामुळे मोदींवर काही काळासाठी प्रचारावर बंदी घालण्यात यावी.
मोदींच्या या विधानावर टीका करताना पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटद्वारे म्हटले होते की, जर भारताने आपल्याकडील अणुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवला नसेल तर पाकिस्ताननेही त्यांच्याकडील अणुबॉम्ब ईदसाठी नक्कीच ठेवला नसेल’ त्यामुळे मोदी अशा प्रकारे खालच्या पातळीला जाऊन राजकारण का करीत आहेत? असा सवालही त्यांनी विचारला होता.