नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात उद्या (शुक्रवार) विरोधी पक्षांचे खासदार प्रतिकात्मक निदर्शने करणार आहेत. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी ते पाऊल उचलले जाणार आहे.
कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी आठ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. त्या आंदोलकांनी मोदी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जंतर-मंतर परिसरात निदर्शनरूपी शेतकरी संसदेचे आयोजन केले आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याचे औचित्य त्यासाठी साधण्यात आले आहे. आता शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी जंतर-मंतरवर जाण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे. तेथील निदर्शनांत कॉंग्रेस नेते राहुल गांधीही सहभागी होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांच्या मागणीवर आणि पेगॅसस पाळत प्रकरणावर संसदेत चर्चा घेण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे गदारोळ होऊन संसदेचे कामकाज काही दिवसांपासून ठप्प झाले आहे. आता जंतर-मंतरवर जाऊन सरकारची आणखी कोंडी करण्यासाठी विरोधक सरसावल्याचे मानले जात आहे.