नवी दिल्ली – केंद्र सरकारने शेतीच्या संबंधात जी तीन विधेयके आणली आहेत ती ऐतिहासिक स्वरूपाची आहेत, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. या विषयावरून विरोधी पक्षाचे लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे.
कालच अकाली दलाच्या कॅबिनेट मंत्री हरसिम्रत कौर यांनी ही विधेयके शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करून मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. तसेच विविध राज्यांमध्ये शेतकरी या विधेयकांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केलेल्या या दाव्याला महत्त्व आहे.
बिहारमधील एका निवडणूक प्रचारसभेला व्हिडिओ माध्यमातून संबोधित करताना ते बोलत होते. ते म्हणाले की, या तरतुदींतून शेतकऱ्यांना नवीन स्वातंत्र्य देण्यात आले आहे. शेतकरी आता आपला माल कोठेही नेऊन विकू शकतात.
अमुक एका मार्केट कमिटीतच आपले उत्पादन विकण्याची त्यांच्यावर आता सक्ती असणार नाही. त्यामुळे आता दलालांच्या कचाट्यातून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. शेतकऱ्यांना याची चांगली जाणीव असून दलालांच्या समर्थनार्थ कोण उभे आहे हेही शेतकऱ्यांना कळून चुकले आहे असे त्यांनी नमूद केले.
कॉंग्रेसने सुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना त्यांचा माल मुक्तपणे विकण्याची अनुमती देण्याचे आश्वासन दिले होते, असे ते म्हणाले. पण आता हेच लोक शेतीविषयक विधेयकांवरून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
या विधेयकांद्वारे शेतकऱ्यांचे सुरक्षा कवच अधिक मजबूत करण्यात आल्याचा दावाही मोदींनी केला आहे. शेतकऱ्यांसाठी हमी भाव जाहीर करण्याची सध्या सुरू असलेली पद्धत कायम राहील, असे ते म्हणाले. ही पद्धत रद्द केली जात असल्याचा खोटा आरोप विरोधकांकडून लावला जात आहे असेही त्यांनी सांगितले.