नवी दिल्ली: राजकीय प्रतिस्पर्ध्यांना लक्ष्य करण्यासाठी बेधडक शब्दांचा वापर होत असल्याने लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यांसाठीचा प्रचार चांगलाच तापला आहे. प्रतिस्पर्ध्यांच्या होणाऱ्या उल्लेखांवरून राजकीय वादंगही होत आहे. त्यापार्श्वभूमीवर, विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख तब्बल 56 आक्षेपार्ह शब्दांनी केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी केला.
गडकरी यांनी गुरूवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना मोदींबद्दल अपशब्दांचा वापर करत असल्यावरून विरोधकांवर टीकास्त्र सोडले. त्या अपशब्दांची यादी आपल्याकडे असल्याचेही त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी गरिबी उच्चाटनाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसची सर्व राजकीय विश्वासार्हता संपुष्टात आली असल्याची टीका केली.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांनी गरिबी हटवण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी निवडणुका जिंकण्यासाठी गरिबी हटाओचा नारा दिला. त्यानंतर राजीव गांधी, सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनीही त्याचीच री ओढली. मात्र, गरिबी संपली नाही. आता नेहरूंचा पणतूही (राहुल गांधी) गरिबी हटवण्याची भाषा करत आहे, अशी खिल्ली गडकरी यांनी उडवली.