मुंबई: अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या चर्चेला अखेर आज पूर्ण विराम मिळाला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. दरम्यान त्यांनी, भाजप विरोधी पक्ष फोडत आहे, या विरोधकांच्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले.
मुख्यमंत्री म्हणाले, विरोधकांना आपले लोक सांभाळता येत नाहीत. त्यांच्या नेत्यांचा त्यांच्या पक्षनेतृत्वावर विश्वास नाही असं असताना त्यांनी उगाच भाजपला दोष देऊ नये. भाजपच्या सकारात्मक राजकारणाकडे पाहून विरोधी पक्षातले लोक भाजपमध्ये येत आहेत. विरोधी पक्षांची जनतेशी नाळ तुटली आहे. त्यांचा लोकांशी जनसंपर्क राहिलेला नाही त्यामुळेच त्यांचा लाजीरवाणा पराभव झाला. या पराभवातून ते काहीही शिकले नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
तसेच, विरोधी पक्षांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले. या बहिष्कारामागची भूमिका विशद करताना धनंजय मुंडे म्हणाले, “१७ जून दुष्काळ दिन साजरा केला जातो. त्याच दिवशी या सरकारने दुष्काळाकडे लक्ष दिलेले नाही. दुष्काळाने राज्य होरपळत आहे. सरकारचे दुष्काळाकडे लक्ष नाही. आम्ही दुष्काळी भाग पिंजून काढला. मात्र राज्याचे मंत्रीसुद्धा दुष्काळी भागात फिरकले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी एसीमध्ये बसून आढावा घेतला आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना विदेशवारीनंतर आता शेतकऱ्यांची आठवण आली आहे. असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला.
Interaction with media as the Monsoon Session of Maharashtra Legislature begins tomorrow.#BudgetSession https://t.co/25Y3NLzZD2
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 16, 2019