मुंबई – देशातील कोरोना संकटाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असतानाच स्थलांतरित कामगारांच्या प्रवासावरून देखील वातावरण चांगलंच तापलंय. अशातच आज महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी, ‘केंद्राकडून महाराष्ट्रातून पश्चिम बंगालला जाण्यासाठी ७ रेल्वेगाड्यांची परवानगी मिळाली असताना देखील ममता बॅनर्जी यांच्या सरकारकडून अद्याप एकाही रेल्वेगाडीस परवानगी मिळाली नाही.’ असा आरोप केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील पश्चिम बंगाल सरकारवर अशाच प्रकारचा आरोप करताना पश्चिम बंगाल सरकार केंद्रातर्फे परवानगी देण्यात आली असताना देखील परराज्यात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी श्रमिक रेल्वेगाडयांना आडकाठी करत असल्याचं म्हंटलं होतं. यानंतर पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी गृहमंत्र्यांनी आपले आरोप सिद्ध करून दाखवावेत असं थेट आव्हान दिलं होतं.
स्थलांतरित कामगारांच्या प्रवासावरून केंद्र व पश्चिम बंगाल सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली असतानाच महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या वादामध्ये उडी घेतली असून त्यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे महाराष्ट्र-पश्चिम बंगाल दरम्यान श्रमिक रेल्वेगाडी धावण्यासाठी लवकरात लवकर परवानगी देण्यात यावी असं देखील म्हंटल आहे.
आता फडणवीस यांनी केलेल्या दाव्याला राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारतर्फे दुजोरा दिला जातो की या वक्तव्याचे खंडन केले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.