मुंबई – राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी आत्तपासूनच आमदारांचा घोडेबाजार सुरू केला आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 13 जूनला निवडणूक होत आहे. संख्याबळानुसार पाच जागांचे गणित निश्चीत आहे पण सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजप मध्ये रस्सीखेच सुरू आहे.
त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी हा आरोप केला आहे. सहाव्या राज्यसभेच्या जागेसाठी विरोधकांच्या घोडेबाजाराच्या प्रयत्नातून विरोधकांची ईर्षा दिसून येते. भ्रष्टाचाराचा पैसा आणि त्यातून होणारा घोडेबाजार हे दुष्टचक्र कधी थांबणार?असा सवाल राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. शिवसेना सहावी जागा लढवणार आहे. कोणी काहीही केले तरी अंकगणित महाविकास आघाडीकडे आहे. आम्ही लढू आणि जिंकू,असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे.
सेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कालच आपला पक्ष राज्यसभेच्या निवडणुकीत दुसरा उमेदवार उभा करेल आणि सेनेचा दुसरा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास व्यक्त केला होता.
पीयूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे (तीघेही भाजप), पी चिदंबरम (कॉंग्रेस), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी) आणि संजय राऊत (शिवसेना) या महाराष्ट्रातील सहा राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ जुलै रोजी संपत आहे. त्यांच्या मुदतपुर्ती मुळे या सहा जागांवर निवडणूक होणार आहे. चारही पक्षांनी अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
भाजपकडे असलेल्या आमदारांच्या संख्याबळानुसार ते राज्यसभेच्या दोन जागा जिंकू शकतात, तर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एक जागा जिंकू शकतात. त्यामुळे सहाव्या जागेसाठी लढत होणार आहे.
संभाजीराजे यांनी नुकतीच राज्यसभेची पुढील निवडणूक अपक्ष म्हणून लढविणार असल्याचे जाहीर केले आहे आणि सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. ते आधी भाजपशी संलग्न होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संकेत दिले आहेत की त्यांचा पक्ष संभाजीराजे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊ शकतो, परंतु, जर त्यांना महाविकास आगाडीतील इतर दोन घटकांची मते मिळाली नाहीत तर त्यांची निवडणूक कठीण होऊ शकते असे त्यांनी म्हटले आहे. राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना 24 मे रोजी जारी केली जाईल. 13 जून रोजी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल.