नगर – कांदा आयात करायचा होता तर तो दोन महिने अगोदर आयात का केला नाही, केंद्र सरकारला शेतकऱ्यांचे काहीच देणे घेणे नाही, केंद्र सरकार प्रश्नांवर शेतकरी प्रश्नांवर बेजबाबदार आहे, असा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज लगावला. भाजपमध्ये मोदी व शहा सोडले तर सर्व शोषित आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली, राज्य सरकारला अभ्यास करायला वेळ दिलाच पाहिजे, मात्र नागपूर अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाने इतर मुद्दे उपस्थित करत काम करू दिले नाही, विरोधी पक्षाला शेतकऱ्यांचे काही देणे घेणे नाही, विरोधी पक्ष बेजबाबदारपणे वागत आहे, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.
नगर येथे स्वाभिमानी शेतकरी पक्षाची बैठक शासकीय विश्रामगृह आज पार पडली, त्यानंतर शेट्टी पत्रकारांशी बोलत होते, राजू शेट्टी म्हणाले की केंद्र सरकारने तुर्कस्तान मधून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला, वास्तविक पाहता तो निर्णय त्यांनी दोन महिने अगोदरच घ्यायला पाहिजे होता, कांदा आयात करून एक प्रकारे त्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे, या अगोदर चा कांदा शेतकऱ्यांचा नव्हता तो व्यापाऱ्यांचा होता हे त्यांना माहीत होते निसर्गाच्या खाईतून शेतकरी बाहेर पडत असताना त्याला कांद्याला भाव मिळेल अशी अपेक्षा होती.
मात्र त्याच वेळेला कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे कांद्याचे दर कोसळले गेले वास्तविक पाहता या केंद्र सरकारला शेतीतले काहीच कळत नाही असा टोलाही शेट्टी यांनी लगावला मी संसदेमध्ये शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे व कर्जमुक्ती दिली पाहिजे हे दोन विषय मांडले होते ,वास्तविक पाहता त्यावर या सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही.