मुंबई – महाविकास आघाडी सरकारने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न संवेदनशील रितीने हाताळले आहेत. महाविकास आघाडी सरकारने गृह खात्यासाठी पूर्ण वेळ गृहमंत्री दिला असून विरोधक कायदा व सुव्यवस्थेवर उपस्थित करत असलेले प्रश्न बिनबुडाचे असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत केली.
विधान परिषद नियम 260 अन्वये विरोधकांनी राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करुन सरकारवर आरोप केले होते. हे आरोप मिटकरी यांनी खोडून काढले.
भाजप सत्तेत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद स्वतःकडेच ठेवले होते. पूर्ण वेळ गृहमंत्री राज्याला नव्हता. त्या काळात राज्यातील गुंडांचे मुख्यमंत्र्यांसोबत फोटो असल्याचे आम्ही पाहिले. खरंतर कायदा व सुव्यवस्थेवर बोलण्याचा विरोधकांना अधिकार नाही.
जो डान्सबार स्व. आर.आर. आबांनी बंद केला होता, तो भाजपच्या काळात सुरु करण्यात आला. भाजप नेत्या चित्रा वाघ आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत अश्लाघ्य टिप्पणी करणाऱ्या दोन जणांना महाविकास आघाडी सरकारने काही वेळातच अटक केली होती हे भाजपचे लोक कसे विसरले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
काही दिवसांपूर्वीच मालाड येथील मालवणी मधून भाजपच्या अल्पसंख्याक विभागाच्या युवक अध्यक्षाला अटक करण्यात आली. हा युवक बांग्लादेशी नागरिक असल्याचे समोर आले आहे. भाजपच्या नवी मुंबईतील एका बड्या नेत्याने त्याचे इंटरनॅशनल डॉनशी संबंध असल्याचे म्हटले आहे. त्यावर भाजपची काय भूमिका आहे? असा प्रश्न त्यांनी केला. महाराष्ट्राचे पोलीस खाते, गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली असल्याचा पुनरुच्चार यावेळी मिटकरी यांनी केला.