ईव्हीएमवरील आक्षेप निराधार
नवी दिल्ली – कॉंग्रेस सह अन्य विरोधी पक्षांना लोकसभा निवडणुकीतील आपला संभाव्य पराभव पचवता येणे जड जात असल्याने त्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रांच्या विरोधात आत्तापासूनच खोटी ओरड सुरू केली आहे असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते व केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला आहे. त्यांनी लोकशाहींचाच अवमान आता सुरू केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पराभवाच्या भीतीने कॉंग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांनी हॉरर शो सुरू केला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. देशातील लोकशाही आणि घटनात्मक सिस्टीमचा त्यांनी आपल्या सोयीनुसार वापर चालवला आहे असे नक्वी आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले. ते म्हणाले की विरोधकांनी पहिल्यापासूनच ईव्हीएम विषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. या विषयावर संसदेत या आधीही अनेक वेळा चर्चा झाली आहे.
आपल्या आरोपांमागील नेमके लॉजिक मांडण्यासही त्यांना अपयश आल्याचा दावा त्यांनी केला आहे. कॉंग्रेसच्या एका नेत्याने आता विदेशात जाऊनही ईव्हीएम विषयी बदनामीची मोहीम सुरू केली आहे असे ते म्हणाले. पराभवाचे खापर मतदार यंत्रावर फोडणे हाच त्यांचा एकूण प्रयत्न आहे. कॉंग्रेसला त्यांच्या घराण्याचा पराभव पचवणे जड जात आहे. त्यामुळे त्यांनी लोकशाहीविषयीच अविश्वासाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न चालवला आहे असे ते म्हणाले.