नवी दिल्ली – वाढती महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंवर मोदी सरकारने लावलेल्या जीएसटीच्या विरोधात विरोधकांनी आजही लोकसभेत जोरदार गदारोळ केल्याने लोकसभेचे कामकाज तिसऱ्या दिवशीही विस्कळीत झाले होते. प्रथम सगळे विषय बाजूला ठेऊन महागाई आणि वाढीव जीएसटीवर चर्चा सुरू करा, अशी एकमुखी मागणी विरोधी पक्षांनी लाऊन धरली होती. त्यानंतर वारंवार कामकाज तहकूब करावे लागले. त्यानंतर शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब झाले.
आज सकाळी सभागृहाची बैठक सुरू झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी विरोध करणाऱ्या सदस्यांना सांगितले की, शून्य तासात ते मुद्दे मांडण्याची संधी देऊ. हे सभागृह चर्चेसाठी आहे, घोषणाबाजीसाठी नाही. अशा प्रकारचे आचरण सभागृहाच्या प्रतिष्ठेसाठी योग्य नाही आणि सदस्यांनी तो सभ्यपणा पाळण्याची गरज आहे असे सभापती म्हणाले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
विरोधक अत्यंत आक्रमक होते. सभापतींनी त्यांना नंतर प्रश्न मांडण्याची परवानगी दिली जाईल, असे आश्वासन देऊनही सदस्यांनी सभागृहाच्या वेलमध्ये घोषणाबाजी सुरू केली. त्यावर संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधकांना सदस्यांना चर्चेत रस आहे की नाही? असा प्रश्न विचारला.
गोंधळ सुरूच राहिल्याने बिर्ला यांनी कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केले, परंतु सभागृहाची पुन्हा बैठक झाली तेव्हा विरोधकांनी पुन्हा विरोध सुरू केला.यावेळी अनेक विरोधी सदस्य फलक हातात धरून घोषणाबाजी करत सभागृहाच्या वेलमध्ये घुसले. काही जण ताक आणि दही यांसारख्या वस्तूंवर लावण्यात आलेला जीएसटी मागे घेण्याची मागणी करणारे फलक घेऊन निषेधाच्या घोषणा देताना दिसले. अखेर शेवटच्या तहकुबीनंतरही गोंधळ सुरूच राहिल्याने दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला.