एकीकडे तुटवडा तर दुसरीकडे बेरोजगारी : नोकरीच्या शोधात अनेक तरुण पुन्हा शहरात
पिंपरी – लॉकडाऊननंतर सर्वच उद्योग-व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. अनेक उद्योग आणि व्यवसायांना सध्या मनुष्यबळाची कमतरता सतावत आहे, तर दुसरीकडे शहरात पुन्हा अनेक तरुण नोकरीच्या शोधात फिरत आहेत. एकीकडे कामगारांचा तुटवडा असताना दुसरीकडे तरुणांना नोकरी मिळत नसल्याचे विरोधाभासी चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. अनेक तरुण नोकऱ्यांसाठी फिरत आहेत, परंतु त्यांना नोकरी मिळत नाही. तर काही ठिकाणी नोकरी मिळवून देण्यासाठी नोंदणीच्या नावाखाली बेरोजगारांकडून पैसे घेतले जात आहेत.
शहरात दहा हजाराहून अधिक लहान-मोठे उद्योग आहेत. तसेच आयटीनगरी अशी देखील या शहराची ओळख आहे. या शहरात नोकरी मिळेल या आशेने मोठ्या संख्येने तरुण येतात. लॉकडाऊनच्या काळात अनेक तरुण नोकऱ्या सोडून आपपल्या गावी गेले. हे तरुण आता परत येत असून पुन्हा एकदा नोकरीच्या शोधात फिरत आहेत. नोकरी व अन्य मार्गाने रोजगार मिळवून देण्याच्या बहाण्याने कित्येक तरुणांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. लहान मोठ्या कारखान्यात कामगार म्हणून तर मोठ-मोठ्या आयटी कंपन्यांत आयटीयन्स म्हणून नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणुकींचे अनेक प्रकार आतापर्यंत घडले आहेत.
केवळ 25 टक्के एजन्सीच्या माध्यमातून
शहरात शेकडो लहान-मोठ्या आयटी कंपन्या कार्यरत आहेत. त्याच्या कैक पट अधिक नोकरीच्या शोधार्थ आयटीनगरीत येतात. यात दक्षिण आणि उत्तर भारतातील तरुणांची संख्या खूप अधिक आहे. शहरात असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळावी, अशी अपेक्षा उराशी बाळगून आलेले हे तरुण अगदी सहज या नोकरीच्या सौदागरांच्या गळास लागतात.
कंपन्यांची कामे आता पुन्हा पूर्वपदावर येत असल्याने नवीन भरती सुरु होत आहेत. याचाच फायदा अनेक प्लेसमेंट एजन्सी घेतात. परंतु आयटी क्षेत्रातील कंपन्या केवळ 25 टक्के भरतीच प्लेसमेंट एजन्सीच्या माध्यमातून करतात. ते ही अधिकृत एजन्सीद्वारे. या एजन्सींना कंपन्या स्वतः त्यांच्या कामाचे शुल्क देतात. कोणत्याही उमेदवाराकडून पैसे घेण्याची त्यांना परवानगी नसते. बहुतेक भरती ही थेट कंपनीद्वारेच होते.
नोंदणीसाठी शुल्क
आयटी क्षेत्रातील बहुतेक नोकऱ्या या हाय स्किलफ प्रोफेशनल्ससाठी असल्याने आयटी कंपन्यांसाठी काम करणाऱ्या प्लेसमेंट एजेन्सी देखील विशिष्ट असतात. परंतु पिंपरी-चिंचवडमध्ये आयटीबाबत कोणतीही माहिती नसणारे, कोणत्याही कंपनीसोबत प्लेसमेंट संबंधी अनुबंध नसलेल्या एजन्सी आयटीत नोकरी मिळवून देतो, असे सांगून नोंदणी शुल्काच्या नावाखाली पैसे घेतात. ही रक्कम त्या मानाने कमी असल्यामुळे शक्यतो तरुण नोकरी न मिळाल्यास तक्रार करत नाहीत.
सोशल मीडियाद्वारे फसवणूक
विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नोकरी उपलब्ध असल्याची जाहिरात टाकून फसवणूक केली जाते. तसेच नकली वेबसाइट तयार करुनही फसवणूक केल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. गेल्या वर्षी हिंजवडी पोलीस ठाण्यात नोकरी देण्याचे आमिष दाखवून कित्येक तरुणांकडून लाखो रुपये लुबाडल्याचे दोन गुन्हे दाखल झाले होते. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये फसवणूक झालेल्या तरुणांची संख्या खूप अधिक आहे. त्यात प्रामुख्याने दक्षिण भारतातून आलेल्या तरुणांची फसवणूक झाली होती. आता पुन्हा नोकरीच्या शोधात तरुण शहरात येत असल्याने अधिक सर्तक राहण्याची गरज आहे.
ऑनलाइन फसवेगिरी
नोकरी मिळवून देण्याऱ्या कित्येक वेबसाइट्सवर तरुण आपला बायोडेटा आणि कोणत्या क्षेत्रात नोकरी हवी आहे, याची माहिती अपलोड करतात. काही ठग अशा साइट्सवरील माहिती घेऊन इच्छुक तरुणांशी संपर्क साधतात व सीव्हीफ शॉर्टलिस्टेड झाला आहे. मोठ्-मोठ्या कंपन्यांची नावे घेऊन टेलिफोनिक इंटरव्यू होणार असल्याचे सांगतात. त्याआधी प्रोफाइल अपडेट करायच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करतात.
शहरात नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याच्या घटना पूर्वी घडल्या आहेत. आता पुन्हा मोठ्या संख्येने तरुण शहरात नोकरीच्या शोधात आलेले दिसत आहेत. तसेच काही कंपन्यांनी देखील भरती सुरु केली आहे. तरुणांनी एक गोष्अ पक्की ध्यानात ठेवायला हवी की कोणतीच कंपनी नोकरी देण्यासाठी पैशांची मागणी करत नाही. पैशांची मागणी होत असल्यास सावध व्हावे आणि तक्रार करण्यासाठी पुढे यावे.
– हरप्रीत सलूजा, अध्यक्ष, नेसेन्ट इनफार्मेशन टेक्नोलॉजी एम्प्लॉइज सीनेट