चिंबळी -केंद्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा मार्ग हा खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील खालुंब्रे, निघोजे, मोई, कुरूळी, चिंबळी, आळंदी, चऱ्होली खुर्द, धानोरे आदि भागातून जाणार आहे. यात शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी जाणार आहेत. यामुळे छोटे-मोठे उद्योजक शेतकरी ग्रामस्थ या प्रकल्पाला विरोध करत आहेत.
मुंबईहून हैदराबादला जाणारी बुलेट ट्रेन खेड तालुक्यातून जाणार आहे. या रेल्वे मार्गाचे सध्या सर्वेक्षण सुरू आहे. बुलेट ट्रेनचा प्रस्ताविक मार्ग खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील आठ गावांमधून पुढे हवेली तालुक्यातून जाणार आहे.
बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी 17.5 मीटर रुंदीची जमीन संपादन केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून व मिळकतीमधून बुलेट ट्रेनचा मार्ग प्रस्तावित आहे. त्या ठिकाणचे सर्वेक्षण सुरू आहे.
बुलेट ट्रेन प्रस्तावित मार्गाला खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकल्प खेड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घराच्या जागेमधून जाणार असल्याने अल्पभूधारक भूमिहीन होण्याची भीती आहे.
बुलेट ट्रेनमुळे खेड तालुक्यातील अनेक कामगार, ग्रामस्थांची घरे, बागायत शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. या परिसरात अल्पभूधारक शेतकरी जास्त असून शेतकरी भूमिहीन होतील. प्रस्तावित बुलेट ट्रेनला विरसेध असून शेतकऱ्यांच्या बरोबरीने जन आंदोलन उभे करण्याची तयारी आहे.
– आशिष येळवंडे, माजी उपसरपंच निघोजे
कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. प्रस्तावित जागेतून केंद्र सरकारने लादलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्प आमच्यावर अन्यायकारक आहे. या प्रकल्पाला पूर्णपणे विरोध आहे.
-अरुण फलके, मोई