कराड – साखर साखरसम्राटांची राज्यात मक्तेदारी झाली आहे. बारामतीच्या मुखियांनी साखर सम्राटांना आपापला सुभा मजबूत करून साखर कारखानारुपी गढ्या उभारायला सांगितले. तसेच त्यांनी सभोवतालच्या परिसराची लूटमार करण्यासाठी या गढ्या ताब्यात ठेवल्या आहेत. परंतु, त्या गढ्या उध्वस्त करण्याची भाजपला संधी आहे, असे सूचक विधान माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.
येथील शासकीय विश्रामगृहात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात येणाऱ्या पदयात्रा व धडक मोर्चाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे, जिल्हाउपाध्यक्ष मुसद्दीक आंबेकरी, बापूराव जगदाळे, सुनिल भुसारी, अनिल डुबल, नागराज शिंदे, शिवाजी पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी मंत्री खोत म्हणाले, साखर कारखान्यांसाठी केंद्र सरकारने पंधरा किलोमीटर हवाई अंतराची अट घातली होती. त्यात तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारने दहा किलोमीटरची आणखी भर घालून हे अंतर 25 किलोमीटरचे केले. देशात या कायद्याला तीन कृषी विधेयकांच्या माध्यमातून छेद देण्यात आला होता. या कृषी कायद्यांना शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेसह रयत क्रांती संघटनेने पाठिंबा दिला होता. परंतु, मूठभर दलाल आणि हरियाणातील शेतकऱ्यांमुळे सरकारला हे विधेयक मागे घ्यावे लागले. साखर सम्राटांनी शेतकऱ्यांची पिळवणूक चालवली असून त्यांची मक्तेदारी मोडीत काढण्याची भाजप सरकारला संधी आहे. या सरकारने तसे केल्यास राज्यातील शेतकरी गुलाल उधळून त्यांचे स्वागत करतील, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
दरम्यान, रयत क्रांती संघटना, सरपंच परिषद व महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 22 मे रोजी कराड ते सातारा पदयात्रा काढण्यात येणार असून येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पदयात्रेस सुरुवात होईल. त्यांनतर सातारा ते मंत्रालय धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत तीन-चार महिन्यांपासून शासन स्तरावर पाठपुरावा सुरु आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकही पार पडली. मात्र, मागण्यांबाबत तोडगा न निघाल्याने अखेर पदयात्रा व धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांना मतांचा अधिकार द्यायला हवा होता
मी राज्यमंत्री असताना कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना मतांचा अधिकार देण्याबाबतचे विधेयक मंजूर करून घेतले होते. मात्र, त्यानंतरच्या महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द केला. परंतु, त्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने सदरचा निर्णय पुन्हा अंमलात आणून बाजार समितीत शेतकऱ्यांना मतांचा अधिकार द्यायला हवा होता. मात्र, त्यांनी तसे न केल्याबाबतची खंत सदाभाऊ खोत यांनी यावेळी बोलून दाखवली.
साखरसम्राटरुपी उंदीर भाजपच्या जहाजात
काही साखरसम्राटांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, या प्रश्नावर बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, राजकारणाचे जहाज बुडायला लागल्यावर साखरसम्राटरुपी उंदीर भाजपच्या जहाजात बसले. परंतु, सरकार कोणतेही असले; तरी शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये. रयतेचे राज्य आणायचे असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे सर्व वतने खालसा करून प्रत्यक्ष त्यांच्या वतनाला हात न लावता वतन तुमचेच आहे, असे सांगितल्यास सर्व काही सुरळीत होईल, असे खोत यांनी यावेळी सांगितले.