नवी दिल्ली – विधानसभा निवडणुकांनी जनतेला मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्या निवडणुकांत भाजपचा पराभव करून जनता महागाई, बेरोजगारी संपुष्टात आणू शकते, अशा शब्दांत कॉंग्रेसने शनिवारी प्रमुख राजकीय प्रतिस्पर्ध्यावर शाब्दिक हल्लाबोल केला.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाचे कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्वागत केले. त्याचवेळी त्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली.
त्या पक्षाच्या राजवटीत देशात महागाई, बेरोजगारी या समस्यांनी उग्र रूप धारण केले आहे. महिला आणि दलितांवरील अत्याचारांत वाढ झाली आहे. भाजप हा शेतकरीविरोधी पक्ष आहे. आता निवडणुकांवेळी जनता त्या पक्षाला धडा शिकवू शकते, असे सुर्जेवाला म्हणाले.
केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असावे, अशी भूमिका भाजपकडून मांडली जाते. त्यासाठी तो पक्ष डबल इंजिन सरकारांचा शब्दप्रयोग वापरतो. मात्र, उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये भाजपची डबल इंजिन सरकारे दुहेरी अपयशाची ठरल्याची खिल्ली त्यांनी उडवली. त्या राज्यांत आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्याचा संदर्भ त्यांनी घेतला.