वर्धा: राज्यातील आगामी निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरव्दारे घ्याव्यात यासाठी आज विरोधकांची एक बैठक झाली. यावेळी विरोधकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. त्यालाच उत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईव्हीएमवर शंका घेण्यापेक्षा विरोधकांनी आत्मपरिक्षण करावे, असे म्हटले आहे. तर तिकडे आपला ईव्हीएमवर विश्वास नसल्याचे सर्वपक्षिय नेत्यांनी म्हटले असून त्यासाठी येत्या 21 ऑगस्टला मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करणे हे अविश्वास दर्शविण्यासारखे आहे. ते न करता आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे. तर महाराष्ट्राच्या विकासासाठी गुणवत्ता असलेल्या आमदार-पदाधिकारी व अन्य नेत्यांना भाजपात सुरू असलेला प्रवेश आता बंद झाला असला तरी विदर्भातील नेत्यांचे आम्ही स्वागत करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले आहे.