भाजपच्या बैठकीमध्ये पंतप्रधानांची टीका
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर विरोधक पाकिस्तानच्याच भाषेत बोलत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. प्रस्तावित नागरिकत्व दुरुस्ती विधेयक देशाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहीले जाणार आहे.
हे विधेयक राज्यघटनेतील 370 कलम रद्द करण्याच्य विधेयकाप्रमाणेच ऐतिहासिक आहे. मात्र काही विरोधी पक्ष तर स्वल्पविराम किंवा पूर्णविरामही न बदलता पाकिस्तानच्याच भाषेत बोलत आहेत, अशा शब्दात भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
विरोधक पाकिस्तानच्या भाषेत नागरिकत्व दुरुस्तीच्या विधेयकावर बोलत करत असल्याची टीका पंतप्रधानांनी कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेसच्या संदर्भाने केली. हे विधेयक देशातील मूस्लिमांबाबत भेदभाव करत आहे आणि राज्यघटनेचे उल्लंघन करत असल्याची टीका या पक्षाच्या सदस्यांनी केली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही हे विधेयक भेदभाव करणारे आणि प्रतिगामी असल्याची टीका केली होती.