मुंबई – भाजपा समाजमाध्यमे किंवा ओपिनियन पोलच्या माध्यमातून ज्या अफवा पसरवतोय, त्यावर विश्वास ठेवू नका. गोव्यात आणि उत्तरप्रदेशमध्ये शंभर टक्के परिवर्तन होतय, हे तुम्ही लिहून ठेवा, असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, गोव्यात देखील भाजपा सरकारमधील प्रमुख मंत्री मायकल लोबो यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांचे दुसरे प्रमुख आमदार प्रवीण झान्टे यांनी देखील भाजपा सोडली. म्हणजेच भाजपा गोव्यात, उत्तर प्रदेशमध्ये देखील अभेद्य नाही.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे अनेक आमदार यांनी गेल्या काही दिवसांमध्ये समाजवादी पार्टीत प्रवेश केलेला आहे. याचा अर्थ असा आहे की हवामानाचा अंदाज काही जणांना आलेला आहे. मौर्य यांनी देखील आज राजीनामा दिला आहे. ते ज्येष्ठ मंत्री व नेते आहेत आणि त्यांच्याबाबतीत असे बोलले जातय, की त्यांना हवेचा अंदाज पटकन येतो. त्यामुळे भाजपाने तिथे सावधगिरी बाळगावी.
आता लाटांचे तडाखे बसायला लागले आहेत. सध्याच्या लाटा थोड्या मंद आहेत. पण त्या उसळू शकतात, जहाज हेलकावे खाऊ शकते असे वातावरण आहे. शिवसेनेची उत्तर प्रदेशमध्ये तयारी आहे, लवकरच समजेल. उद्या मी दिल्लीत जात आहे तिथून उत्तर प्रदेशला जातोय. त्यामुळे शिवसेना एक पक्ष म्हणून जे काय करायचं आहे ते करत राहील असे त्यांनी नमूद केले.