जयपुर: राज्यसभा निवडणुकीच्या निमीत्ताने आपल्या आमदारांची भाजपकडून पळवापळवी होऊ नये म्हणून राजस्थानातील कॉंग्रेस आमदारांचा मुक्काम काल दिल्ली-जयपुर रस्त्यावरील एका रिसॉर्ट मध्ये हलवण्यात आला आहे. येत्या 19 जूनला राज्यसभेची निवडणूक होत आहे. त्यात भारतीय जनता पक्षाने त्यांच्या आमदार क्षमतेपेक्षा एक उमेदवार जादा दिला आहे. त्यामुळे आमदारांची पळवापळवी होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही उपाययोजना करण्यात आली आहे.
भाजपकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीच केला असून त्यांनी स्वता आमदारांना ज्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे, तेथे देखरेख ठेवली आहे.
राजस्तानातून राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. कॉंग्रेसने तेथे दोन जणांना उमेदवारी दिली असून, भारतीय जनता पक्षानेही तेथे दोन उमेदवार दिले आहेत. 200 सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत कॉंग्रेसकडे 107 आमदार आहेत. राज्यातील 13 अपक्षांपैकी 12 अपक्षांचा कॉंग्रेस सरकारला पाठिंबा आहे.
भारतीय जनता पक्षाकडे 72 आमदार आहेत. कॉंग्रेसकडे असलेल्या संख्याबळानुसार त्यांचे दोन्ही उमेदवार सहज निवडून येतील. तथापि भाजप आपला दुसरा उमेदवार कसा निवडून आणणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.