महेश जाधव
मायणी – कण्हेर डाव्या कालव्यांतर्गत येणाऱ्या तारळी प्रकल्पातील धोंडेवाडी, ता. खटाव येथील जलसेतूचे आणि पळसगाव, ता. खटाव येथील पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. ही दोन्ही कामे पुढील वर्षी जानेवारीअखेर पूर्ण होतील. त्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये तारळीचे पाणी मायणी परिसरात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
खटाव तालुक्यातील कायम दुष्काळी भागातील शेती पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कण्हेर डाव्या कालव्यांतर्गत तारळी उपसा सिंचन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत धोंडेवाडीतील जलसेतू व पळसगाव येथील पुल यांची कामे निधीअभावी रखडली होती. या रखडलेल्या कामाकडे शासनाकडून गांभीर्याने लक्ष दिले जात नव्हते.
त्यामुळे धोंडेवाडी, सूर्याचीवाडी व पळसगाव येथील ग्रामस्थांनी आंदोलन उभे केले. त्यामुळे मे व जूनमध्ये या भागातील ग्रामस्थांना पिण्यासाठी अर्धवट काम झालेल्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते; परंतु जलसेतू व पुलाचे रखडलेले काम पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने शासनाने फेरनिविदा काढून जादा निधी मंजूर केला.
त्यातून जलसेतू व पुलाचे काम सुरू झाले असून ही दोन्ही कामे जानेवारीपर्यंत पूर्ण होणार असल्याचे ठेकेदाराने सांगितले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मायणी परिसरात तारळी योजनेचे पाणी खळाळताना दिसणार आहे. त्यातून या भागातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यास मदत होईल.
पावणेपाचशे मीटर लांबीचा जलसेतू
धोंडेवाडी येथील जलसेतू 468 मीटर लांबीचा असून त्यामध्ये 15 मीटर अंतराचे 31 गाळे आहेत. जलसेतूची उंची 5 मीटर ते 12 मीटर आहे. दीड बाय दीड मीटर अंतरातून जलसेतूच्या वरील भागातून पाणी वाहणार आहे.
दहा गावांचा पाणीप्रश्न सुटणार
मायणी, मोराळे, धोंडेवाडी, पळसगाव, कातरखटाव, अनफळे, सूर्याचीवाडी, दगडवाडी, दातेवाडी व चितळी या गावांच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या प्रकल्पामुळे मार्गी लागणार आहे.