एमएमआरसीएलला दिलासा ः हायकोर्टाने स्थगिती उठवत याचिका फेटाळली
मुंबई : पुण्यातील मेट्रोचा परस्पर मार्ग बदलणाऱ्या एमएमआरसीएलला मुंबई उच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला आहे. मार्ग बदलण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेली स्थगिती उठवित विरोध करणारी याचिकाच फेटाळून लावली आहे.
रामवाडी ते नगर व्हाया आगा खान पॅलेस असा मेट्रोचा मार्ग एमएमआरसीएलने निश्चित केला होता. परंतु मेट्रोच्या मार्गात अचानक बदल करण्यात आला. आगा खान पॅलेस ऐवजी हा मार्ग आता कल्याणीनगर येथील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य येथून वळविण्यात आला.
यामुळे हे अभयारण्य या मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणार असून सुमारे 300 झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे. याशिवाय या मार्गाचा खर्चही 185 कोटी रुपयांनी वाढणार आहे. येथील पर्यावरणाला धोका पोहोचू नये यासाठी कल्याणीनगर येथील रहिवासी दीपक नाथानी यांनी हायकोर्टात ऍड. आदित्य प्रकाश शिर्के आणि ऍड. शोण गाडगीळ यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.
मागिल सुनावणीच्यावेळी न्यायालयाने जोपर्यंत केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी केली जात नाही तोपर्यंत रामवाडी ते वनाज मार्गावरील मेट्रोचे काम थांबवा, असे आदेश देत मेट्रोचे काम रोखले होते. आज न्यायालयाने मेट्रोचे रखडलेले काम पाहता स्थगिती उठवत याचिकाच निकाली काढली.