मुंबई – महाराष्ट्रातील सर्व प्रार्थनास्थळे सोमवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर सुरू करण्यात आली. कित्येक महिने केली जात असलेली मागणी नुकतीच मान्य झाली. तर यातच रझा अकादमीने राजभवनातील मशीद नमाजासाठी उघडण्याची मागणी केली आहे. रझा अकादमीनं यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र दिलं आहे.
इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार, रझा अकादमीचे महासचिव एम. सईद नुरी यांनी राज्यपालांना हे पत्र लिहिलं आहे. देशात सगळीकडे धार्मिक स्थळ खुली करण्यात आलेली असताना राजभवनातील कर्मचाऱ्यांना मशिदीत शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. केवळ पाच ते सात लोकांना नमाजसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. आमची विनंती आहे की तात्काळ आदेश काढून कर्मचाऱ्यांना करोनापूर्वीप्रमाणेच नमाज पठण करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, असं राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.