नवी दिल्ली: कॉंग्रेसने गुरुवारी आपली ऑनलाइन मोहीम सुरू केली. ज्याला ‘स्पीकअप’ प्रोग्राम असे नाव दिले आहे. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोहिमेची सुरूवात केली. ‘स्पीक अप’ मोहिमेअंतर्गत पक्षाच्या देशभरातील नेत्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला. दरम्यान त्यांनी मोदी सरकारला प्रवासी मजुरांसाठी तिजोरी उघडण्याचे सुचविले.
सोनिया गांधी म्हणाल्या की, देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आम्ही अशा प्रकारच्या वेदना पहिल्या . कामगारांना घरी जाण्यासाठी हजारो किलोमीटर पायी जाण्यास भाग पाडले गेले. सरकार वगळता सर्वांनी कामगारांच्या विवंचना ऐकल्या. सरकारने तिजोरी उघडावी आणि प्रत्येक गरीब कुटुंबाला दरमहा 7500 रुपये द्या. या व्यतिरिक्त स्थलांतरित मजुरांना सुरक्षित घरी पाठवा.
गरीब, मजूर आणि छोट्या व्यावसायिकांना मदत करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरू केली असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. कामगारांना घरी नेण्यासाठी सुरक्षित व मोफत प्रवासाची व्यवस्था करावी, त्यांच्या उपजीविकेची व्यवस्था करावी, रेशनदेखील द्यावे, मनरेगामध्ये २०० दिवस काम निश्चित करा, छोट्या-छोट्या उद्योगांना कर्ज देण्याऐवजी आर्थिक मदत द्या, म्हणजे कोट्यावधी रोजगार वाचतील आणि देशाची प्रगतीही होईल. अशी मागणी कॉंग्रेस अध्यक्षांनी केली.