दि.31 डिसेंबर “डेडलाइन’ : पुढील 50 दिवसांत पालिकेची कसोटी
पुणे – राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी)मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार महापालिकेस दि.31 डिसेंबरपर्यंत उरुळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचे ओपन डम्पिंग बंद करावे लागणार आहे. त्यासाठी पालिकेच्या हातात अवघे 50 दिवस असून या काळात शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर 100 टक्के प्रक्रिया करणे बंधनकारक असणार आहे. तर पालिकेने या प्रतिज्ञापत्रानुसार, गेल्या 2 वर्षांत सुमारे 1,350 टन क्षमतेचे नवीन प्रकल्प उभारले असून 200 टन क्षमतेचा आणखी एक प्रकल्प निविदा प्रक्रियेत असून त्याचेही काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
उरुळी देवाची येथील कचरा डेपोच्या जागेवर 1993 पासून मोठ्या प्रमाणात कोणतीही प्रक्रिया न करता शेकडो टन कचऱ्याचे ओपन डम्पिंग महापालिकेने केले होते. त्या विरोधात या परिसरातील ग्रामस्थांनी महापालिकेविरोधात 2008 पासून तीव्र आंदोलने केली. त्यामुळे हा कचरा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर गेला. त्यानंतर पालिकेच्या विरोधात “एनजीटी’मध्ये वेगवेगळे दावे दाखल झाले होते. त्यावर “एनजीटी’ने एकत्रित घेतलेल्या सुनावणीत “पालिकेने आधी त्या ठिकणी साठून असलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी, तसेच शहरात निर्माण होणाऱ्या 100 टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करून उरुळी देवाची येथील कचरा डेपोच्या ठिकाणी होणारे ओपन डम्पिंग 100 टक्के बंद करावे,’ असे आदेश दिले. त्यावेळी पालिकेकडून कचरा प्रक्रियेसाठीचा कालबद्ध कार्यक्रम तसेच 31 डिसेंबर 2019 पासून 100 टक्के ओपन डम्पिंग बंद करण्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
अशी आहे सद्यस्थिती
शहरात नवीन 11 गावे समाविष्ट झाल्यानंतर दरदिवशी सुमारे 2,100 टन कचरा जमा होतो. त्यातील सुमारे 1,480 टन कचऱ्यावर पालिकेच्या वेगवेगळ्या 57 प्रकल्पांमध्ये प्रक्रिया केली जाते. तर उर्वरित 600 ते 700 टन कचऱ्याचे ओपन डम्पिंग केले जाते. हे डम्पिंग बंद करण्यासाठी पालिकेकडून “एनजीटी’मध्ये दिलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार सुमारे 1,550 टन क्षमतेचे नवीन प्रकल्पाचे काम हाती घेतले आहेत. त्यातील सुमारे 600 टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प डिसेंबर 2019 अखेर कार्यांवित होणार आहेत. तर सुमारे 750 टन क्षमतेच्या प्रकल्पाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. तर, शेवटचा 200 टन क्षमतेचा प्रकल्प निविदा प्रक्रियेत असून येत्या महिनाभरात त्यालाही मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन प्रतिज्ञापत्राच्या नियोजित वेळेचे पालन करत असल्याचे चित्र आहे.
हरित लवादाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार गेल्या वर्षभरात नवीन प्रकल्पाचे नियोजन असून डिसेंबर 2019 अखेरपर्यंत शहरात निर्माण होणाऱ्या 100 टक्के कचऱ्यावर पालिका प्रक्रिया करेल. तसेच उरुळी देवाची येथील ओपन डम्पिंगही 100 टक्के बंद केले जाईल.
– ज्ञानेश्वर मोळक, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग