नियमांकडे दुर्लक्ष : दोन वर्षे उलटली तरी काही महाविद्यालयात यंत्रणाच नाही
पिंपरी – कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेऊन फक्त परीक्षेपुरतेच येणाऱ्या विद्यार्थ्यांना चाप बसावा आणि महाविद्यालयांना शिस्त लागावी, यासाठी शिक्षण विभागाने कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे. हा निर्णय घेऊन दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश महाविद्यालयात अद्याप बायोमेट्रिक हजेरीची यंत्रणाच बसविण्यात आली नाही. त्यामुळे, शासनाच्या या निर्णयाला शहरातील महाविद्यालयांनी पूर्णपणे खो दिल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरासह पुणे शहरात महाराष्ट्रातील विविध भागातून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. शहरातील नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी धडपड सुरु असल्याचे चित्र प्रवेश प्रक्रियेवेळी दरवर्षी पहायला मिळते. प्रवेश घेतल्यानंतर मात्र अनेक विद्यार्थी महाविद्यालयात जाण्याऐवजी खासगी शिकवणी वर्गातच जातात. त्यामुळे, महाविद्यालयात नियमित तासिका होत नाहीत. याचा फटका गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसत असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे, मागील दोन वर्षांपूर्वी महाविद्यालयांना शिस्त लागवण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व महाविद्यालयांना त्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेणे बंधनकारक केले होते. मात्र, हा निर्णय फक्त विज्ञान शाखेसाठीच लागू करण्यात आला होता.
हा नियम लागू केल्यानंतर दोन वर्षाचा काळ लोटला तरी अद्याप पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश महाविद्यालयाने या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविद्यालयांची बायोमेट्रिक हजेरीची प्रक्रियाच केले नसल्याचे समोर आले आहे. यावरुन शिक्षण विभागाच्या नियमांना महाविद्यालय व्यवस्थापन जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.
खाजगी शिकवण्याचे वाढत जाणारे प्रस्थ, महाविद्यालयातील वर्गाऐवजी शिकवणीमध्ये होणारी गर्दी. महाविद्यालयात न येताही प्रात्यक्षिक परीक्षेत पैकीच्या पैकी गुण घेणारेही अनेक विद्यार्थी दिसून येतात. त्यामुुळे, महाविद्यालयातील तास करण्याऐवजी खाजगी शिकवणीकडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. यामुळे, अजूनही काही महाविद्यालयातील वर्ग ओस असल्याचे स्थितीदिसून येते. हा प्रकार लक्षात घेऊनच माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बायोमेट्रिक हजेरी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेणे बंधनकारक करण्यात आले. मात्र, याकडे सोयीस्कररीत्या महाविद्यालयांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
वेगळेच चित्र
अनेक विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळत नाही, असे विद्यार्थी शहरापासून दूर परंतु त्यांच्या घराजवळ असलेल्या महाविद्यालयांमध्ये नाईलाजास्तव प्रवेश घेतात. अशा महाविद्यालयांमध्ये वर्ग ओस पडले असतात. तर काही प्रख्यात महाविद्यालयांच्या परिसरात एकूण प्रवेशाच्या कैक पट अधिक तरुणांची गर्दी दिसून येते. आपले महाविद्यालय सोडून दुसऱ्या महाविद्यालयाच्या परिसरात रेंगाळणाऱ्या तरुणांची संख्याही खूप अधिक आहे. तर काही महाविद्यालयांच्या पटांगणात, परिसरात खूप गर्दी असते परंतु त्यांचे वर्गही ओस पडलेले असतात. विद्यार्थ्यांना परिसरातून वर्गापर्यंत आणणे महाविद्यालयासाठी मोठे आव्हान ठरत आहे.
शिक्षण विभागाचे दुर्लक्ष
कनिष्ठ महाविद्यालयांनी बायोमेट्रिक यंत्रे बसवल्याबाबतची खात्री करुन शिक्षण विभागाने त्याचा अहवाल शासनाला द्यायचा होता; मात्र, आता दोन वर्षे झाली. यावर्षीचे पहिले शैक्षणिक सत्र संपून दुसरे सत्र सुरु झाले; तरी देखील बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी अनेक ठिकाणी होत नाही. शिक्षण विभागाने वेळीच तपासणी केली असती तर या महाविद्यालयांना शिस्त लागली असती असे बोलले जात आहे.