प्रेमवीरांचे “कसमे वादे’
यवतेश्वर घाटात संध्याकाळनंतर अंधाराचा आसरा घेऊन प्रेमीयुगुले रस्त्याच्या कडेला कठड्यावर एकांताच्या शोधात बसलेल पहायला मिळतात. त्यामुळे या घाट रस्त्याला संध्याकाळनंतर प्रेमी युगुलामुळांमुळे लव्हर्स पॉईंटचे स्वरुप आले आहे. घाटातील पावर हाऊस झोपडपट्टीच्या पुढेपासून सांबरवाडीपर्यंत प्रत्येक वळणावर प्रेमी जोडप्यांचे हात हातात घेऊन कसमे वादे सुरू असतात.
देखण्या घाटाचे विद्रुपीकरण
यवतेश्वर घाटात जागोजागी दारुच्या बाटल्या, पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा खच पडलेला पहायला मिळतो. त्याचबरोबर चकण्यासाठी वापरलेल्या खाद्यपदार्थांच्या पाकिटांचा कचराही मोठ्या प्रमाणावर पडलेला आहे. त्यामुळे देखण्या घाट मार्गाचे कचऱ्यामुळे विद्रुपीकरण होत होऊ लागले आहे. वेळीच या प्रकाराला आळा घालण्याची गरज निर्माण झाली असून संबंधितांनी त्याकडे गांभीर्याने पाहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
ठोस कारवाईची आवश्यकता
कास पठार पाहण्यासाठी देशभरासह परदेशातून पर्यटक येत असतात. त्यातच कासची वल्ड हेरिटेजमध्ये निवड झाल्यापासून कास पुष्प पठाराला भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे हे पर्यटन जपणे गरजेचे आहे. परंतु कास मार्गाला तळीरामांसह प्रेमी युगुलांमुळे अवकळा प्राप्त झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने ठोस कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.