तृणमूल कॉंग्रेस, सपा, बसपा, आप, द्रमुक गैरहजर
नवी दिल्ली : कॉंग्रेसने नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावर विरोधी पक्षांना एकजूट करण्यासाठी बोलाविलेली बैठक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापासून ते बसपाप्रमुख मायावती यांच्यासह जवळपास सहा मुख्य पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीला दांडी मारली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला या बैठकीबाबत काही माहिती नव्हती, अशी चर्चा रंगली आहे.
कॉंग्रेसने नागरिकत्व कायदा आणि एनआरसीसह विविध मुद्यांवर सरकारला घेरण्याची रणनिती बनविण्यासाठी विरोधी पक्षांची एक बैठक आज संसदेच्या आवारात बोलाविली होती.
मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस, माकपा आणि राष्ट्रीय जनता दलाला सोडले तर कोणताही मोठा पक्ष या बैठकीला हजर नव्हता. कॉंग्रेसने या बैठकीत सामील झालेल्या वीस राजकीय पक्षांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, यातील बहुतांश पक्षांची नावे कुणाला ठाउक सुध्दा नाहीत अशी आहेत.
कॉंग्रेसच्या या बैठकीला ज्या प्रमुख पक्षांनी दांडी मारली त्यात तृणमूल कॉंग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि आम आदमी पक्ष प्रमुख आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आधीच या बैठकीत सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले होते. तर, मायावती यांनी ट्वीटच्या माध्यमातून या बैठकीवर बहिष्कार टाकला होता.
दुसरीकडे, कॉंग्रेसने बोलाविलेल्या या बैठकीबाबत आपल्याला काहीही माहित नाही. यामुळे यात सहभागी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे आपचे नेते संजय सिंग यांनी सांगितले. मात्र, दिल्लीच्या निवडणुकीमुळे आपने या बैठकीला दांडी मारली असल्याचे समजते.
आपने नागरिकत्व कायदा आणि एनआरसीला संसदेत विरोध दर्शविला होता. एवढेच नव्हे तर यानंतर झालेल्या विरोधकांच्या बैठकीला हजेरी सुध्दा लावली होती.
आजच्या बैठकीत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माजी संरक्षण मंत्री ए.के. अँटोनी, माकपाचे सिताराम येचुरी, अहमद पटेल, वेणूगोपाल, राकॉंचे प्रफुल्ल पटेल, शरद यादव, जेएमएमचे हेमंत सोरेन, राजदचे मनोज झा, आदी नेत्यांनी भाग घेतला.