कालिदार कोळंबकर, वैभव पिचड, संदीप नाईक व शिवेंद्रराजे भोसले यांचा आमदाराकिचा राजीनामा
मुुंबई (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणूकीच्या तोंडावरच कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला आमदारांच्या फुटीरतेची ओहोटी लागली आहे. तर दुसरीकडे भाजपात भरतीची लाट सुरु झाली आहे. कॉंग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर (वडाळा) यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संदीप नाईक (ऐरोली), शिवेंद्रराजे भोसले (सातारा) आणि वैभव पिचड (अकोले) या चार आमदारांनी आज आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला. राजीनामानाट्यानंतर हे चारही आमदार उद्या, बुधवारी भाजपामध्ये भरती होणार आहेत.
गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला अमरावती येथून प्रारंभ करत आहेत. तत्पूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार-पदाधिकारी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. कॉंग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर, राष्ट्रवादीचे शिवेंद्रराजे भोसले, संदीप नाईक, वैभव पिचड आदी भाजपात प्रवेश करण्यापूर्वी सकाळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची विधानभवनात भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले. अध्यक्षांनी त्यांचे राजीनामे मंजूर केले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते.
कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांचा त्यांच्याच पक्षावरचा विश्वास उडाला आहे. लोकांचाही आता त्यांच्या नेत्यावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे आता त्यांच्या आमदारांनीच पक्षात राहायचे नाही असे ठरवले असून ते भाजपात येत असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या 83 आमदारांपैकी 50 आमदारांना त्यांच्या पक्षात राहायचे नाही, असा दावाही त्यांनी केला.
आज भाजपा प्रवेश
आमदारकीचा राजीनामा दिलेले कालिदास कोळंबकर, वैभव पिचड, संदीप नाईक व शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यासुद्धा भाजपात प्रवेश करणार आहेत. उद्या, बुधवारी गरवारे क्लब येथे सकाळी पक्षप्रवेश सोहोळा होणार आहे.