मिझोरामचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचे मत : “सूर्यदत्ता’तर्फे विविध पुरस्कारांचे वितरण
पुणे – आपल्या देशाला प्राचीन संस्कृती, परंपरा लाभली आहे. आज प्राचीन आणि आधुनिकतेच्या संगमातूनच राष्ट्राची प्रगती शक्य आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना रुजवण्याचे काम करायला हवे, असे प्रतिपादन मिझोरामचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी केले.
सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त पिल्लई यांच्या हस्ते सूर्यदत्ता राष्ट्रीय जीवनगौरव व सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक अध्यक्ष आचार्य डॉ. लोकेश मुनीजी, विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया आदी उपस्थित होते.
लेफ्ट. जनरल (निवृत्त) डॉ. दत्तात्रय शेकटकर (राष्ट्रसेवा), डॉ. विकास आमटे (वैद्यकीय सामाजिक सेवा), द्वारका जालान (साहित्य), टोनींनो लॅम्बोर्गिनी (आंतरराष्ट्रीय उद्योजकता), पद्मश्री सुधा मल्होत्रा (पार्श्वगायन), डॉ. मकरंद जावडेकर (कॉर्पोरेट), डॉ. कमल टावरी (खादी आणि समग्र विकास), मनोरंजन ब्यापारी (साहित्य), फरीद शेख (छायाचित्रण आणि पुरातन कॅमेऱ्यांचे संग्रहण), डॉ. रेणू राज (कायदा आणि न्यायव्यवस्था) यांना सुर्यदत्ता राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पद्मश्री सोमा घोष (भारतीय शास्त्रीय संगीत), डॉ. अर्णब भट्टाचार्य (शिक्षण आणि संशोधन), राजेश बत्रा (लोकसेवा), विमल बाफना (कॉर्पोरेट, सीएसआर), महेश नामपूरकर (स्थापत्यशास्त्र आरेखन), नमिता कोहक (शौर्य), गोपिका वर्मा (नृत्यकला-मोहिनीअट्टम व वारसा संवर्धन) यांना सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
डॉ. विष्णू महाराज पारनेरकर यांना सूर्यरत्न आधुनिक युगाचे संत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचा पुरस्कार त्यांचे चिरंजीव गणेश यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला, तर लोम्बार्गिनीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी फेरोसिया लोम्बार्गिनी यांनी पुरस्कार स्वीकारला.
सोहळ्यातून त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती जोडण्याचे काम सूर्यदत्ता करत आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. विद्यार्थ्यांची उत्तरोत्तर प्रगती होण्यात त्यांच्या आदर्श महत्त्वाचा ठरत आहे, असे डॉ. पटवर्धन यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. संजय चोरडिया, सूत्रसंचालन शिल्पा भेंडे आणि सिद्धांत चोरडिया यांनी केले. समूह संचालक डॉ. शैलेश कासंडे यांनी आभार मानले.