मुंबई – इंग्लंड दौऱ्यावर दाखल झाल्यावर भारतीय संघाला केवळ तीन दिवस विलगीकरणात राहावे लागणार असून, त्यानंतर लगेचच खेळाडूंना सरावालाही परवानगी दिली जाणार आहे. इंग्लिश व वेल्स क्रिकेट मंडळाने बीसीसीआयचा 3 दिवसांचा विलगीकरणाचा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला इंग्लंडमध्ये केवळ 3 दिवसांसाठी विलगीकरणात राहावे लागणार असून, करोनाबाबतच्या नियमांचे पालन केल्यावर सरावही सुरू करता येणार आहे.
यामुळे खेळाडूंना न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी सराव करण्यास 12 दिवसांचा कालावधी मिळेल. इंग्लंड मंडळाने यापूर्वी बीसीसीआयला दहा दिवसांच्या विलगीकरणाची अट घातली होती. मात्र, खेळाडूंना सरावासाठी केवळ 6 दिवसच मिळतील, असे बीसीसीआयने स्पष्ट केल्यावर हा बदल करण्यात आला. अंतिम सामना 18 जून रोजी साऊदम्प्टनच्या मैदानावर सुरू होणार आहे.
भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही संघ 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होतील. त्यापूर्वी दोन्ही संघ मुंबईत विलगीकरणात राहात आहेत.
बीसीसीआयने कोणत्याही खेळाडूला मुंबईत सराव करण्याची परवानगी दिलेली नाही. तसेच प्रत्येकाची करोना चाचणी केली जात आहे. दौऱ्यापूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या खेळाडूला संघातून वगळण्यात येणार आहे, असेही बीसीसीआयने सांगितले आहे.
भारताचा रवींद्र जडेजा ठरणार ट्रम्प कार्ड
आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम लढत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जून या कालावधीत होत आहे. या लढतीत भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा हाच ट्रम्प कार्ड ठरेल, असा इशारा इंग्लंडचा फिरकी गोलंदाज व क्रिकेट समीक्षक मॉन्टी पानेसर याने न्यूझीलंडला दिला आहे. रवींद्र जडेजा हा भारतासाठी एक्स फॅक्टर ठरेल, तर न्यूझीलंडसाठी अत्यंत धोकादायक ठरेल. या निर्णायक लढतीत फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची असेल. जडेजाचे अफलातून क्षेत्ररक्षण व उच्च दर्जाची फिरकी गोलंदाजी हीच दोन्ही संघातील फरक दाखवेल.