मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आकडा कमी होताना दिसत आहे. मात्र म्हणावा तेवढा अजूनही आकडा कमी झाला नाही. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना लसीकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली. माध्यमांशी संवाद साधताना त्यानी यासंदर्बातील वक्तव्य केले. जे पाहता ज्यांच्या मोबाईलवर मेसेज येणार नाही त्यांना कोरोनाची लस मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
ज्या व्यक्तीला कोरोनाची लस दिली जाणार आहे त्या व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर एक मेसेज येईल. मेसेज आल्यानंतर त्या व्यक्तीची ओळख पटवण्यात येणार आहे. यानंतरच त्या व्यक्तीला लस देण्यात येणार आहे. कोविड नावाच्या पोर्टलवर रजिस्टर असणाऱ्या प्रत्येकाला ज्या तारखेला लसीकरण करण्यात येणार आहे त्या तारखेला एक मेसेज मिळेल. मेसेज मिळताच संबंधित व्यक्तिने केंद्रावर येऊन ओळख पटवल्यानंतरच लस देण्यात येईल. ज्यानंतर पुढील अर्धा तास लसीचे परिणाम पाहण्यासाठी या व्यक्तीला तेथे थांबवण्यात येईल, अशी एकंदर लसीकरणाची प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य शासन लसीकरणासाठी शंभर टक्के तयार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी राज्यातील जनतेला दिला. यंदाच्या वर्षअखेरीस म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या शेवटी केंद्र सरकारने परवानगी दिल्यास जानेवारी महिन्यापासून महाराष्ट्रात लसीकरणास सुरुवात करु, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या प्रक्रियेत लसीकरणाबाबत केंद्राची खात्री पटण आणि त्यांनी यासाठी परवानगी देणे यावरच पुढील मोठे निर्णय अवलंबून असही त्यांनी सांगितले.
लसीकरणाऱ्या पहिल्या टप्प्यात राज्यातील तीन कोटी नागरिकांना लस दिली जाईल. शिवाय देशातील सर्व राज्यांनी मोफत लस मिळावी अशी मागणी केंद्राकडे केली आहे. त्यामुळे आता लसीकरणासाठी फक्त केंद्राच्या परवानगीचीच प्रतीक्षा आहे. मुख्य म्हणजे केंद्राने कोरोनावरील लस मोफत दिली नाही तरीही महाराष्ट्र शासन नागरिकांना वाऱ्यावर सोडणार नाही. पण, तरीही केंद्राकडूनच लस मोफत उपलब्ध करुन देण्यात यावी यासाठी ते आग्रही दिसले.