डॉ. मेघश्री दळवी
मध्यंतरी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार 2050 पासून मुंबई पाण्याखाली जायला सुरुवात होणार आहे. थोडा पाऊस पडला तरी मुंबई तुंबून जाताना आपण पाहातो. ही स्थिती अधिकाधिक भयावह होत जाणार आहे. अरबी समुद्राची पातळी तीन फुटापर्यंत वाढून तो दर वर्षी मुंबईचा लहानमोठा घास घेताना पाहाण्याची वेळ येणार आहे.
ही स्थिती केवळ मुंबईची नाही, त्याच सुमारास कोलकाता शहराचा बराचसा भाग कायम पूरसदृश परिस्थितीत राहणार आहे, आणि माणसांची वस्ती नाईलाजाने आत सरकत जाणार आहे. चेन्नई आणि सूरत इथेही हाच धोका आहे. जगात इतरत्र पाहिलं, तर बॅंकॉक, शांघाय, ऍमस्टरडॅम यांनाही त्याच काळात आपले नकाशे बदलावे लागणार आहेत, आणि शहरी वस्ती पूर्णपणे नव्या जागी न्यावी लागणार आहे. आज या घडीला व्हेनिस शहरात पाण्याची पातळी कधी नव्हे इतकी वाढली आहे, आणि अर्धअधिक जकार्ता शहर राहण्यायोग्य उरलेलं नाही.
नोव्हेंबर 19 ते डिसेंबर 18 हा आपल्याकडे राष्ट्रीय पर्यावरण महिना म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, संवर्धनाचे मार्ग, विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे, याकडे लक्ष वेधण्याचे प्रयत्न या महिन्याभराच्या कालावधीत केले जातात. त्या निमित्ताने शहरं पाण्याखाली जाण्याचा महत्त्वाचा मुद्दा पुढे आला आहे. माणसाने वसाहत केली ती नदी, तलाव, समुद्र, असे पाण्याचे साठे असतील त्यांच्या जवळ. जोवर पाण्याचा वापर, सांडपाण्याची व्यवस्था, आणि माणसांची संख्या हे नियंत्रणात होतं, तोवर ह्या वसाहती भरभराटीला आल्या. पण माणसांची संख्या वाढल्यावर साहजिकच या व्यवस्थेवर ताण येऊ लागला. समुद्रात भराव घालणे, प्रमाणाबाहेर बोअरवेल खोदणे, नद्यांची पात्रं वळवणे असे तात्पुरते उपाय मारक ठरत गेले.
पर्यावरण ही अतिशय गुंतागुंतीची संस्था असते. अनेक घटकांचा त्याच्यावर तात्काळ आणि दीर्घकालीन परिणाम होतो. ते घटकही काही प्रमाणात एकमेकांवर अवलंबून असतात. या घटकांमधले थोडेफार चढउतार, थोडे बदल पचवणं शक्य असतं. पण बदल एका मर्यादेबाहेर गेले, त्यांचं संतुलन ढळलं, की ही संस्था वेगाने कोसळायला लागते, रसातळाला जायला लागते. आज ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगभरातच हवामान विचित्र प्रकारे बदलत आहे, हिमनग वेगाने वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढायला लागली आहे, शहरं खचायला लागली आहेत.
म्हणूनच पर्यावरण आणि त्याच्या घटकांच्या गुंतागुंतीच्या संबंधाची वेगवेगळी मॉडेल्स बनवून युद्धपातळीवर संशोधन होत आहे. मुंबई आणि इतर शहरं 2050पासून पाण्याखाली जायला सुरुवात होणार आहे हे भाकीत या अभ्यासाचं फलित आहे. त्यामुळे आता आपल्या हातात अवघी तीस वर्षे आहेत. येत्या तीस वर्षांमध्ये या भाकिताचा गंभीरपणे विचार करून शहरं पाण्याखाली जाणं कसं रोखता येईल याकडे लक्ष केंद्रित करण्याची वेळ आलेली आहे.