सांगली( प्रतिनिधी) – राज्यातील साखर कारखानदारी ऊस वाहतूकदारांच्या मजबूत खांद्यावरती तारलेली आहे. याच वाहतूकदारासमोर आज अनेक संकट उभे राहिल्यामुळे अलिकडच्या काळात उस वाहतुकदारांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. यामुळे वाहतुकदारांची चाके ज्यादिवशी थांबतील त्यादिवशी राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारी मातीमोल होईल. यामुळे सरकारने याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा राज्यातील सर्व उस वाहतूकदार डिसेंबर व जानेवारीमध्ये कारखान्यांचा गळीत हंगाम बंद करून आंदोलनाची निर्णायक भुमिका जाहीर करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेटटी यांनी सांगली येथील उस वाहतूकदार संघटनेच्या मेळाव्यात केली.
साखर उद्योगामध्ये ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या अडचणीकडे साखर उद्योगातील शिखर संस्था म्हणून कार्यरत असणा-या राज्य साखर संघाने आजपर्यंत कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत.
राज्यामध्ये एकुण ९ लाख उसतोडणी मजूर आहेत. या उसतोडणी मजुरांचे मुकादमाकडून मोठ्या प्रमाणात फसवणुक होत आहे. साखर उद्योगातील कणा असलेल्या ऊ- स तोडणी मजूर व वाहतुकदार यांना राज्य साखर संघाने व सरकारने दुर्लक्षित करून उपेक्षित ठेवले आहे. उसतोडणी मजुरांचे महामंडळ करण्याचे मागणी राज्यात सर्वात पहिल्यांदा २००७ साली विधानसभेत केली होती मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले होते.
सरकारने काही वर्षांपूर्वी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने महामंडळांची स्थापना केली. ऊस उत्पादक शेतकर्यांच्या ऊसातून वर्षाला १०० कोटी रूपयाचा हा निधी कपात करून या महामंडळाला उर्जितअवस्था आणलेली आहे. मात्र शासनाकडून याबाबत कशापध्दतीने या महामंडळाचे कामकाज होणार आहे हे अजूनही स्पष्ट झालेली नाही.
ऊस वाहतूकदारांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना काढण्यासाठी तज्ञ समिती नेमून त्याची कार्यपध्दती निश्चित केली पाहिजे. या महामंडळाकडून ऊस तोडणी मजूरांना बांधकाम कामगार प्रमाणे आरोग्य विमा , पेन्शन , साहित्य पुरवठा कायदेशीररित्या ऊस वाहतूकदार व मजूरांना सरंक्षण दिले पाहिजे. महामंडळाकडे उस मजुरांची नोंदणी करून वाहतूकदारांना महामंडळाकडून मजूर पुरवठा करण्यात यावा यामुळे उस वाहतुकदारांची फसवणूक होणार नाही.
या मेळाव्यास जिल्हाध्यक्ष महेश खराडे , पोपट आण्णा मोरे , संजय बेले ,जि. प. सदस्य विशाल चौगुले , पं. स. सदस्य राहूल सकळे , धनाजी पाटील , माधव पाटील , शिवाजीराव माने देशमुख , यांचेसह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील उस वाहतूकदार उपस्थित होते.