नवी दिल्ली – या अगोदरच्या औद्योगिक क्रांतीमधील तंत्रज्ञान आगामी काळात कंपन्यांना फारसे उपयोगी पडणार नाही. यासाठी उद्योग क्षेत्राने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपली कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढविण्याची गरज असल्याचे उद्योग आणि वाणिज्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी म्हटले आहे.
आगामी काळामध्ये आपल्याला फक्त उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवायची नाही तर पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही अशा पद्धतीने उत्पादन घ्यावे लागणार आहे. यासाठी संबंधित तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. त्यासाठी मशीन लर्निंग, आटोकेशन आणि बिग डेटा ऍनालिसिस यासारख्या बाबींचा वापर करावा लागणार आहे. भारतातील बडे उद्योग या दृष्टिकोनातून पुढाकार घेत आहेत.
थोड्या उद्योगांनीही मोठ्या उद्योगाचे या क्षेत्रात अनुकरण करण्याची गरज असल्याचे पटेल यांनी या विषयावर फिक्की या उद्योजकांच्या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले. कमी कालावधीत भारताला विकसित देश करण्याची महत्त्वाकांक्षा सध्याच्या केंद्र सरकारने बाळगली आहे. राज्यांना विश्वासात घेऊन यासाठी आवश्यक त्या उपाययोजना विविध पातळ्यांवर करण्यात येत आहेत.
उद्योगांना उद्योग करणे सुलभ व्हावे याकरिता कायद्यामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये उद्योगांनी सरकारच्या या धोरणाला प्रतिसाद देऊन उत्पादकता वाढविण्याची गरज आहे. केंद्र सरकार सरकारी उद्योगांचे खासगीकरण करून जास्तीत जास्त क्षेत्रे खासगी उद्योगाकडे सोपविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे खासगी क्षेत्राची जबाबदारी वाढणार असल्याचे त्या म्हणाल्या.
नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले की, नवे उद्योग विशेषता स्टार्टअप परंपरागत पद्धतीला आव्हान देत असल्यामुळे परंपरागत उद्योगाच्या तंत्रज्ञानात सुधारणा करण्याची गरज आहे. अन्यथा परंपरागत तंत्रज्ञानावर चालणारे उद्योग फार काळ टिकणार नाहीत. आता जगामध्ये चौथी औद्योगिक क्रांती चालू असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात उद्योगांनी माहिती घेऊन संबंधित तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे.
आता उद्योगामध्ये रोबोटच्या माध्यमातून ऑटोमायझेशन, सिमुलेशन, डेटा ऍनालायसीस, क्लाऊड कॉम्प्युटिंग, सायबर सेक्युरिटी, इंटरनेट ऑफ थिंग्स, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा प्रकारच्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा. या अगोदर भारत विविध तंत्रज्ञानामध्ये मागे पडला होता मात्र यावेळी आपल्याला जगाबरोबर राहण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. तरच भारत नजीकच्या भविष्यात विकसित देश होऊ शकेल असे त्यांनी सांगितले.