नागपूर – देशभरात आजपासून करोना प्रतिबंधक लसीच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात करोनायोद्ध्यांना लस देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध शहरांमध्ये लसींचे डोस पोहचविण्यात येत आहे. मात्र करोना लस सुरक्षेवरून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लस घेण्यासाठी अट घातली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना प्रतिबंधक लस आधी घ्यावी. त्यानंतरच आपण करोना लस घेऊ असा, पावित्रा आंबेडकर यांनी घेतला आहे. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे म्हटले असून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या २७ जानेवारी रोजी राज्यात शाहिन बाग प्रमाणे किसानबाग आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
औरंगाबादच्या नामकरणावरून आंबेडकर यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली. नामकरण करण्यासाठी औरंगाबादकरांचे मतदान घ्यावे, अस त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत मत व्यक्त केले. बंड केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असं ते म्हणाले.