संदीप बर्वे ः महात्मा गांधी व्याख्यानमालेत मार्गदर्शन
पिंपरी – भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मात्र महात्मा गांधींनी सत्याग्रह आणि अहिंसेचा वापर करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. म्हणून अणु बॉम्बला उत्तर महात्मा गांधी आहे, असे मत गांधीवादी कार्यकर्ते संदीप बर्वे यांनी व्यक्त केले. मोरवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघ आणि म्हाडा सांस्कृतिक मंडळ यांच्या सहकार्याने आयोजित महात्मा गांधी व्याख्यानमालेत महात्मा गांधी आणि सत्याग्रह या विषयावर संदीप बर्वे बोलत होते. यशवंत आपटे, सिंधू खंडागळे, नलिनी लोटकर आदी उपस्थित होते.
संदीप बर्वे म्हणाले की, जगात अणुबॉम्ब इतके आहेत की, पृथ्वी 23 वेळा नष्ट करता येणार आहे. हा विकोप टाळण्साठी युनो 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधी जयंती दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा करते. मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला, आँग सान स्यु की सारख्या अनेक जागतिक नेत्यांनी महात्मा गांधीचा आदर्श समोर ठेवून अनेक लढे यशस्वी केले आहेत. पर्यावरणवादी संघटना अनेक लढे शांततेच्या मार्गाने यशस्वी करतात. त्यांनी वापरलेले बैठे सत्याग्रह, मूक मोर्चे हे गांधीवादी मार्गच श्रेष्ठ आहेत, असेही बर्वे यांनी यांनी नमूद केले. यावेळी यशवंत आपटे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयीचे उदात्त विचार मांडले. पंडित भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर, उल्हास झिरपे यांनी आभार मानले.