मुंबई: राज्यात दसऱ्यापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. त्यात नारायण राणे यांच्यावरही त्यांनी टीका केली. याच टीकेला नारायण राणे यांनी उत्तर दिले होते. दरम्यान, नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देलीत, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकासानीची पाहणी करण्यासाठी अशोक चव्हाण औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारलं असता अशोक चव्हाण म्हणाले की, ” माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याविषयात मला काही बोलायचे नाही. पण त्यांनी केलेल्या विधानांवर कोणी प्रतिक्रिया देत नाही, याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या. त्यांची किंमत काय आहे. विषय शिवसेनेचा आहे. शिवसैनिकच योग्यवेळी त्यांना उत्तर देतील कारण ते पूर्वश्रमीचे शिवसैनिक आहेत, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.”
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती आहे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आरक्षण टिकावे आणि सुनावणी पूर्ण घटनापीठासमोर व्हावी, अशी राज्य सरकारचीही भूमिका आहे. मंगळवारी सुनावणी आधीच्या बेंचसमोर होणे सरकारला अपेक्षीत नव्हते. ती संविधानिक बेंचसमोर व्हावी, अशी विनंती सरकारच्या वतीने करण्यात येणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.