मुंबई : कॉंग्रेसमध्ये सध्या नेतृत्वाचा अभाव या मुद्द्यावरून घमासान सुरू झाल्याचे चित्र आहे. त्या चर्चेत मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनीही उडी घेतली आहे. पक्षाला केवळ राहुल गांधीच वाचवू शकतात, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
सद्यस्थितीत गांधी कुटूंबाबाहेरील कुठलाच नेता कॉंग्रेसचे नेतृत्व करू शकत नाही. इतर नेते फक्त कुठल्या तरी गटाचे नेतृत्व करतात. त्यांच्यामुळे गटबाजीला आणखीच प्रोत्साहन मिळेल. पक्षाचे नेतृत्व करू शकतील असे एकमेव नेते राहुल आहेत, असे निरूपम यांनी ट्विटरवरून म्हटले आहे. त्यामुळे पक्षाध्यक्षपदासाठी राहुल यांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू होण्याची चिन्हे आहेत.